विजयाचा 'फडणवीस' ब्रँड; ठाकरेंची वाताहत आणि काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 08:57 IST2026-01-17T08:55:32+5:302026-01-17T08:57:39+5:30
फडणवीस हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत; मुंबईच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे आहेच

विजयाचा 'फडणवीस' ब्रँड; ठाकरेंची वाताहत आणि काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ
मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिकांमध्ये भाजपने मिळविलेल्या चौफेर यशाचे शिल्पकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. गेल्या पाचपंचवीस वर्षांत भल्याभल्यांना जे जमले नाही ते फडणवीस यांनी करून दाखविले; ते म्हणजे मुंबई महापालिकेवर अनभिषिक्त सत्ता असलेल्या ठाकरेंना त्यांनी पराभवाचा जबरदस्त दणका दिला. 'मुंबई म्हणजे ठाकरे' हे समीकरण मोडीत काढणारा नेता हा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. हे यश त्यांच्या नेतृत्वाला मोठी झळाळी देणारे आणि दिल्लीत त्यांचे वजन वाढविणारे आहे. आजच्या या विजयाने राज्यातील सर्वात शक्तिशाली नेता ही त्यांची ओळख अधिकच ठळक झाली आहे.
ठाकरे बंधूंचे भावनिक राजकारण, ठाकरी शैलीत त्यांनी केलेली बोचरी टीका यावर ते अक्षरशः तुटून पडले. शिवाजी पार्कवरील राज ठाकरेंच्या अत्यंत प्रभावी भाषणाला दमदार प्रत्युत्तर देत, 'मराठी माणसांना रोजगार देण्यासाठी मी उद्योग, गुंतवणूक आणणारच' असे त्यांनी ठणकावून सांगितले आणि राज यांच्या भाषणाची हवा काढली. फडणवीस यांनी या निवडणुकीत एकाचवेळी अनेकांवर मात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये चीतपट केले. नागपुरात काँग्रेसचा सफाया केला. मुंबई-ठाण्यात एकनाथ शिंदेंना सोबत ठेवत मांड पक्की केली. भाजपने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या चेहऱ्यावरच मते मागितली होती.
फडणवीस यांचे नेतृत्व आम मतदारांना अत्यंत विश्वासार्ह वाटते, हे या निकालाने पुन्हा सिद्ध केले. भाजप आणि शिंदेसेनेच्या हातात मुंबईकरांनी सत्तेची दोरी दिली आहे. 'तुम्ही मराठी माणसाला वडापावच्या गाड्यांशिवाय काय दिले?' या शब्दात फडणवीसांनी ठाकरेंना घेरले होते, आता वडापावच्या गाड्यांशिवाय आपण मराठी माणसांना बरेच काही देऊ शकतो, हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. मुंबईकरांनी फडणवीसांवर टाकलेल्या विश्वासाचे उतराई होणे हे फडणवीस यांचे आता कर्तव्य असेल. ठाकरे नसतील तर मुंबईचे मराठीपण टिकणार नाही हे आजवर जनमानसावर बिंबविले गेले होते. मुंबईकर तेवढ्याच भावनिकतेने प्रतिसाददेखील द्यायचे. प्रतिसादाची ही दीर्घ मालिका खंडित करत मुंबईकरांनी फडणवीस, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या भरवशाची परतफेड करण्याची जबाबदारी आता या तिघांवरही असेल. मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली तर मराठी माणसांचे खच्चीकरण होईल, अन्य भाषिक लोक त्यांच्या छातीवर बसतील हे जे काही बोलले जात होते ते कसे तथ्यहीन होते हे मराठी माणसांचा समाजाच्या विविध क्षेत्रांत सन्मान वाढवत भाजप आणि विशेषतः फडणवीस यांना सिद्ध करावे लागणार आहे.
ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबईचा गड राखू शकले नसले तरी मुंबईतील मराठीजनांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास टाकल्याचे निकाल सांगत आहे. भाजप मुंबईत जिंकला असला तरी पुढच्या काळात मराठी माणसांचा विश्वास जिंकण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. फडणवीस हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत; मुंबईच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे आहेच; महापालिकेत सत्ता नाही म्हणून आजवर ती जशीच्या तशी अमलात आणण्यात त्यांना अडचणी येत असाव्यात; पण आता त्यांना ते कारण देता येणार नाही. मुंबईत सत्तांतर घडवणे सोपे नव्हते, तरीही त्यांनी ते करून दाखविले, पण त्याहीपेक्षा कठीण आहे ती मुंबईची मराठी ओळख कायम ठेवत खऱ्या अर्थाने हे शहर जागतिक करण्याचे. त्या अर्थाने फडणवीस यांच्याकडे मुंबई मोठ्याच अपेक्षेने पाहत आहे.
केवळ मुंबईच नाही तर राज्यभरात फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने बहुतेक महापालिकांमध्ये दणदणीत यश मिळविले आहे. नागपूरचा गड राखला, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन एकत्रित पवारांना शह दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रमांक एकचे यश मिळविले, ठिकठिकाणी यशाचा डंका वाजविला. अर्थात, या यशात भाजपच्या स्थानिक नेत्यांचे मोठे योगदान आहेच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाला क्रमांक दोनचे यश मिळवून देत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. मुंबईतील यशात मोलाचा वाटा उचलला आणि ठाण्याचा गडही त्यांनी राखला. काकांशी युती करत मित्रपक्ष भाजपला आव्हान देण्याचा अजित पवार यांचा निर्णय मात्र पार फसला. महापालिकेच्या सावलीतील महाराष्ट्राचे राजकारण आता जिल्हा परिषदेच्या अंगणात कोणत्या घडामोडी घेऊन येते ते बघायचे. काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.