WI vs IND 3rd T20I: सूर्यकुमारबाबत रवी शास्त्रींकडून कर्णधार रोहितला कडक ताकीद; म्हणाले…

WI vs IND 3rd T20I: सूर्यकुमार यादव बद्दल घेतलेल्या निर्णयानंतर सुरू झालेल्या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

WI vs IND 3rd T20I: वेस्ट इंडिजविरोधातील मालिकेत सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) बद्दल घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवनं ओपनर म्हणून सुरूवात केली आणि अनेक दिग्गजांनाही धक्का बसला. याप्रकरणी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपलं मत मांडत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला कडक ताकीद दिली आहे.

“सूर्यकुमार निश्चितपणे विश्वचषक संघाचा भाग असणार आहे. अशा स्थितीत त्याने विश्वचषकात ज्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे, त्याच क्रमांकावर त्यानं फलंदाजी करावी. आता रोहित शर्मा ओपनिंग करणार आहे आणि तो परतल्यावर केएल राहुल विश्वचषकात त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल,” असे रवी शास्त्री यांनी एका वेबसाईटशी बोलताना म्हटलं.

“जर तुम्हाला दुसऱ्या खेळाडूला संधी द्यायची असेल तर तुम्ही त्याची चाचणी घेऊ शकता, परंतु जर तुम्ही एखाद्या खेळाडूबद्दल विचार केला असेल की तो विश्वचषकात विशिष्ट क्रमाने खेळेल, तर त्याला या क्रमांकावर खेळायला दिले पाहिजे. याशिवाय कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“तुम्ही त्याला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळेल असं होऊ शकतं. परंतु सूर्यकुमारला ज्या क्रमांकावर खेळायचं आहे, त्यावर त्याला खेळू द्या. जर गरज पडली तर तुम्ही भूमिका घ्या. मीडल ऑर्डमध्ये आपल्या करिअरच्या सर्वत्कृष्ट फॉर्म मध्ये तो आहे आणि त्या ठिकाणी फलंदाजी कशी करायची याची त्याला कल्पनाही आहे. तो या क्रमांकावर अधिक काळासाठी फलंदाजी करू शकतो. त्याचा स्ट्राईक रेटही चांगला आहे. सुरूवातीच्या क्रमांकावर पंतला देखील खेळवलं जाऊ शकतं,” असं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं.

सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वादळी खेळी करून मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २० षटकांत ५ अर्धशतकं व १ शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आजच्या सामन्यातही त्याने  ४४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून ७६ धावा चोपल्या. त्याने अल्झारी जोसेफला मारलेला नाद खुळा शॉट सर्वांचे लक्ष वेधून गेला. भारताने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. 

वेस्ट इंडिजच्या १६४ धावांना प्रत्युत्तरात रोहित शर्माने ( Rohit Sharma) चांगली सुरुवात करून दिली. पण, ५ चेंडूंत ११ धावा करून तो दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८६ धावा चोपल्या. श्रेयस २४ धावांवर, तर सूर्यकुमार ७६ धावांवर बाद झाला. भारताला ३२ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या आणि हातात ७ विकेट्स होत्या. रिषभ पंतनंही जबरदस्त फलंदाजी केली. हार्दिक पांड्या ४ धावांवर माघारी परतला. रिषभने २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३३ धावा केल्या, दीपक हुडाने नाबाद १० धाव केल्या. भारताने १९ षटकांत ३ बाद १६५ धावा करून सामना जिंकला.