U19 World Cup Final, IND vs ENG Live Updates : Raj Bawa चा विक्रम, कपिल देव यांच्या पंक्तित पटकावलं स्थान; ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या आजोबांच्या नातवाची कमाल

U19 World Cup Final, India vs England Live Updates : भारताच्या युवा गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडचा डाव १८९ धावांवर गुंडाळला. राज बावा ( Raj Bawa) आणि रवी कुमार ( Ravi Kumar) या दोघांनी मिळून ९ विकेट्स घेतल्या.

U19 World Cup Final, India vs England Live Updates : भारताच्या युवा गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडचा डाव १८९ धावांवर गुंडाळला. राज बावा ( Raj Bawa) आणि रवी कुमार ( Ravi Kumar) या दोघांनी मिळून ९ विकेट्स घेतल्या.

राज बावाने ९.५ षटकांत ३१ धावांत ५, तर रवी कुमारने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. रवी कुमारने इंग्लंडच्या सुरुवातीच्या दोन फलंदाजांना बाद केल्यानंतर राज बावाने मधल्या फळीला नेस्तानाबुत करताना चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडचा सेट फलंदाज जेम्स रेवला माघारी पाठवले आणि राज बावाने अखेरची विकेट घेत इतिहास रचला.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आठव्यांदा अंडर-१९ विश्वचषक २०२२च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडने १९९८ साली जिंकलेल्या विश्वचषकानंतर त्यांना या स्पर्धेत बाजी मारता आलेली नाही.

६ बाद ६१ अशा अवस्थेतून जेम्सने इंग्लंडचा डाव सावरताना ८ व्या विकेटसाठी जेम्स सेल्ससह ( James Sales ) ९३ धावांची विक्रमी भागीदारी केली. ११६ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ९५ धावा करणारा जेम्स रेवचा अफलातून झेल कौशल तांबेने टिपला. सेल्स ३४ धावांवर नाबाद राहिला.

१२ नोव्हेंबर २००२मध्ये हिमाचल प्रदेश येथे जन्मलेल्या राज बावा खेळाडूंच्या कुटुंबीयातील आहे. त्याचे आजोबा तारलोचन बावा हे १९४८ च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचे सदस्य होते. राज ५ वर्षांचा असताना आजोबांचे निधन झाले. १९४८ साली झालेल्या ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनवर ४-० असा विजय मिळवला होता, त्यामध्ये एक महत्वाचा गोल हा तारलोचन यांचा होता.

राजचे वडील सुखविंदर बावा हे हरयाणाच्या कनिष्ठ हॉकी संघाचे सदस्य होते. १९८८मध्ये त्यांचा १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या कॅम्पमध्येही निवड झाली होती. पण, स्लिप डिस्कमुळे त्यांनी २२ व्या वर्षी कोचिंगला सुरुवात केली. राज बावा याला डान्स करायला आवडतं आणि त्याला अभिनेता बनायचे होते. पण, वडिलांसोबत क्रिकेट मॅच पाहता पाहता तोही याच्या प्रेमात पडला.

आज त्याने विक्रमाला गवसणी घातली. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये ५ विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. २००६ मध्ये अन्वर अलीने ३५ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. राज बावाने आज ३१ धावांत निम्मा संघ बाद करून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

U19WorldCupFinalमध्ये पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी 2006 मध्ये पियूष चावलाने 8 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या. रवी बिश्नोई ( 4-30, 2020), रवी कुमार ( 4-34, 2022) आणि संदीप शर्मा ( 4-54, 2012) यांनाही चारच विकेट घेता आल्या होत्या.

आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात एकाच स्पर्धेत एकाच खेळाडूने डावात १५०+ धावा आणि सामन्यात पाच विकेट्स घेण्याची ही भारतीय खेळाडूची दुसरी वेळ ठरली. यापूर्वी १९८३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी असा पराक्रम केला होता. राज बावाने यूगांडाविरुद्धच्या लढतीत १०८ चेंडूंत नाबाद १६२ धावा केल्या होत्या.