T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तान आता कसे करू शकतात सेमीफायनलसाठी क्वालिफाय? पाहा संपूर्ण गणित

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून हॅटट्रिक साजरी करण्याची संधी रोहित आणि टीमला होती. पण, फलंदाजांनी निराश केल्यानंतर गोलंदाजांना फार काही करण्यासाठी उरलेच नाही.

भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील रविवारच्या सामन्यात निराश केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून हॅटट्रिक साजरी करण्याची संधी रोहित आणि टीमला होती. पण, फलंदाजांनी निराश केल्यानंतर गोलंदाजांना फार काही करण्यासाठी उरलेच नाही.

सूर्यकुमार यादवच्या ६८ धावांच्या जोरावर भारतानं कशातरी १३३ धावांपर्यंत मजल मारली. पण, विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांनी घात केला आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिला पराभव ठरला.

पण भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानचे आता टी २० विश्वचषक सामन्याच्या सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करण्याचे स्वप्न थोडे कठीण दिसत आहे. असं असलं तरी पाकिस्तानचा संघ पूर्णपणे या स्पर्धेतून बाहेर गेलाय असंही म्हणता येणार नाही. पाकिस्ताननं सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणं आवश्यक होतं.

झिम्बाव्बेविरोधातील बांगलादेशच्या विजयानंतर सुपर १२ मधील ग्रुप २ अधिकच थरारक झाला आहे. भारतीय संघाला आपले पुढील दोन सामने बांगलादेश आणि झिम्बाव्बेसोबत खेळायचे आहेत. तीन सामन्यांनंतर चार अंकांसह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट +०.८४४ आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन विजय आणि ५ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट +२.७७२ आहे.

आता गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी भारतीय संघाला संधी आहे. यासाठी भारताला पुढील सामने जिंकावे लागणार असून दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पाकिस्तान आणि नेदरलँडच्या संघाला पराभव करावा लागेल. पाकिस्तानच्या संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची चावी त्यांच्याच हाती आहे.

पाकिस्तानला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. पाकिस्तानला बांगलादेश आणि साऊथ आफ्रिका या दोन्ही संघांचा पराभव करावा लागेल. तसंच नेदरलँडच्या संघानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला तरी पाकिस्तानला फायदा होऊ शकतो. त्यांना नेट रनरेटकडेही लक्ष द्यावं लागणार असून त्यांना भारताच्या पुढे जावं लागेल. याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडच्या सामन्यात पाऊस पडल्यासही पाकिस्तानला मदत मिळू शकेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला १३३ धावांपर्यंत मजल मारता आली होती. लोकेश राहुल ( ९) , रोहित शर्मा ( १५), विराट कोहली ( १२) , दीपक हुडा ( ०)  व हार्दिक पांड्या ( २) हे ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला.  एनगिडीने ४-०-२९-४ अशी उल्लेखनीय कामगिरी केली.  सूर्यकुमारच्या ६८ ( ४०) धावा, अन्य फलंदाजांनी मिळून ५७ (८०) धावा केल्या. सूर्यकुमार व दिनेश कार्तिक यांनी  ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार ४० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ६८ धावांवर माघारी परतला आणि भारताला ९ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.