Rohit Sharma Virat Kohli: रोहित शर्मा-विराट कोहली मधल्या वादाच्या बातम्या समजताच Ravi Shastri त्यांना बोलावलं अन्..., माजी कोचने पुस्तकातून केला खुलासा

२०१९ वर्ल्ड कपच्या दरम्यान आल्या होत्या गटबाजीच्या बातम्या

Rohit Sharma Virat Kohli, Ravi Shastri: भारतीय क्रिकेट संघात सध्याचे दोन सर्वोत्तम फलंदाज म्हणजे कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली. जेव्हा जेव्हा या दोघांसमोर गोलंदाजी करण्याची वेळ येते, तेव्हा गोलंदाजांची पळता भुई थोडी होते. त्यातही जेव्हा हे दोघे एकत्र खेळतात, तेव्हा तर क्रिकेटरसिकांना पर्वणीच असते.

विराट आणि रोहित दोघे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियासाठी एकत्र खेळत आहेत. पण एक वेळ अशी आली होती, जेव्हा दोघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या आल्या. विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असताना टीम इंडियामध्ये दोन गट असल्याच्या बातम्या येत होत्या.

भारताच्या क्रिकेट संघात आणि ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीचा एक गट आणि रोहित शर्माचा दुसरा गट झाला असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनीच यावर थेट भाष्य केले आहे आणि या बातम्यांमागचे वास्तव नक्की काय आहे त्याचा खुलासा केला आहे.

श्रीधर यांनी त्यांच्या 'कोचिंग बियॉन्ड' या पुस्तकात यावर लिहिले आहे. ते लिहितात की, वाद-गटबाजीचे रिपोर्ट्स आले होते पण त्यात दोघांचाही दोष नव्हता. आम्हाला मिडियातून सांगण्यात आले की संघात रोहित कॅम्प आणि विराट कॅम्प आहे आणि कोणीतरी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. अशा गोष्टींना हवा दिली तर या गोष्टी बिघडू शकतात.

रवी शास्त्रींनी घेतला पुढाकार- "विश्वचषकानंतर आम्ही टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजला पोहोचलो. तेथे कोच रवी शास्त्रींनी पहिली गोष्ट अशी केली की त्याने विराट-रोहित दोघांना बोलावून घेतले. रवी शास्त्रींनी दोघांना सांगितले की, संघातील वातारवरण चांगले ठेवण्यासाठी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांसोबत राहणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर जे चालले आहे ते चालू द्या" असे पुस्तकात नमूद केले आहे.

"तुम्ही दोघेही या संघाचे सर्वात वरिष्ठ खेळाडू आहात, त्यामुळे अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत. तुम्ही हे सर्व मागे सोडून एकत्र पुढे जावे असे मला वाटते," असे शास्त्रींना त्यांना सांगितले. रवी शास्त्री यांनी दोघांची भेट घेताच दोन्ही खेळाडूंच्या वर्तणुकीत सुधारणा झाली. त्यानंतर गोष्टी चांगल्या झाल्या आणि त्यामुळे दोन्ही खेळाडू पुन्हा एकत्र आले", असेही त्यांनी लिहिले आहे.