रोहितला काढून हार्दिकला कर्णधार बनवले; मुंबई इंडियन्सची पाच कारणांमुळे वाढणार डोकेदुखी

hardik pandya mi captain : आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.

आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावापूर्वी मोठा उलटफेर झाला अन् रोहित शर्माला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने कर्णधारपदाची माळ हार्दिकच्या गळ्यात घालताच चाहत्यांनी संताप व्यक्त केला.

हिटमॅन रोहितच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला सोशल मीडियावरून अनफॉलो केले. अनफॉलो करणाऱ्यांची संख्या जवळपास पाच लाखांच्या घरात आहे.

खरं तर हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार झाल्याने फ्रँचायझीची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने शुक्रवारी एक मोठी घोषणा करत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर चाहते रोष व्यक्त करत आहे.

हार्दिक पांड्या एक प्रभावी अष्टपैलू खेळाडू यात शंका नाही. याशिवाय त्याने आयपीएलच्या मागील दोन हंगामात गुजरात टायटन्सचे यशस्वीरित्या नेतृत्व केले आहे. पदार्पणाच्या हंगामातच गुजरातला चॅम्पियन बनवण्यात हार्दिकची महत्त्वाची भूमिका होती. पण हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवणे या फ्रँचायझीला महागात पडू शकते.

हार्दिकला अनेकदा दुखापतीचा सामना करावा लागला आहे, किंबहुना आताही तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याला अनेदका दुखापत होते. २०२३ च्या विश्वचषकातही असेच घडले होते. केवळ तीन सामने खेळून तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. त्यामुळे अशा खेळाडूकडे संघाची कमान सोपवणे मुंबईला भारी पडू शकते.

हार्दिकचा फिटनेस पाहता मुंबईला एक स्टँडबाय कर्णधार देखील ठेवावा लागेल. पांड्याच्या अनुपस्थितीत संघाची धुरा कोण सांभाळणार याचा फ्रँचायझीला विचार करावा लागेल. कारण नियमित कर्णधार उपस्थित नसल्यास संघ अडचणीत सापडतो. याचा प्रत्यय आपीएलच्या मागील हंगामात आला. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांचे नियमित कर्णधार अनुपस्थित असल्याने फ्रँचायझीला फटका बसला होता.

दरम्यान, पांड्याची सततची दुखापत पाहता मुंबईची फ्रँचायझी त्याला अष्टपैलू म्हणून मैदानात उतरवेल का? हे पाहण्याजोगे असेल. पांड्याला २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने सोडले कारण तो दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नव्हता. आताही पांड्यासोबत असा प्रकार घडू शकतो. तो १००% तंदुरुस्त नसेल तर मुंबईचे नक्कीच नुकसान होईल.

हार्दिक पांड्या कर्णधार बनल्याने मुंबई इंडियन्सच्या संघातील एकतेलाही धोका निर्माण होऊ शकतो. कारण रोहितच्या नेतृत्वात संघ चांगल्या प्रकारे एकसंघ होता. रोहितप्रती प्रत्येक खेळाडूच्या मनात आदर पाहायला मिळतो. पण पांड्याच्या बाबतीत हे शक्य होईल का? कारण रोहितच्या तुलनेत हार्दिकचा अनुभव फार कमी आहे.

मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक आहे. मात्र, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर लाखो लोकांनी मुंबईच्या फ्रँचायझीला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. हार्दिक कर्णधार झाल्यामुळे चाहते संतापले आहेत आणि त्याचा परिणाम आयपीएल २०२४ मधील मुंबईच्या सामन्यांवरही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते.

त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले.