बाबरसोबतची पहिली भेट अन् तो देत असलेला 'आदर', किंग कोहलीकडून 'विराट' कौतुक

virat kohli on babar azam : पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वात शेजाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उभारी घेतल्याचे दिसते.

पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वात शेजाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उभारी घेतल्याचे दिसते. पाकिस्तानमध्ये वेगवान गोलंदाजांचा साठा असतो, असं क्रिकेट वर्तुळात बोललं जातं. पण, बाबर आझमने पाकिस्तानचा एक प्रभावी फलंदाज म्हणून आपली नवीन ओळख निर्माण केली आहे.

अलीकडेच त्याने लंका प्रीमिअर लीगमध्ये शतक झळकावून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. ख्रिस गेल पाठोपाठ बाबरने देखील ट्वेंटी-२० मध्ये १० शतके झळकावली आहेत.

बाबर आझम आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांची अनेकदा तुलना केली जाते. पण बाबर आपल्यासाठी ज्युनिअर असून तो एक चांगला खेळाडू असल्याची टिप्पणी विराटने केली होती. मात्र, आता किंग कोहलीने बाबरचे कौतुक करताना विविध बाबींवर प्रकाश टाकला.

विराटने अलीकडेच स्टार स्पोर्ट्सशी बोलताना बाबरबद्दल भाष्य केले. बाबर आझमसोबत २०१९ मध्ये मँचेस्टरमध्ये झालेल्या पहिल्या भेटीपासून बाबरशी आपले चांगले संबंध असल्याचे विराट म्हणतो.

विराटने म्हटले, "बाबरला मी पहिल्यांदा २०१९ च्या वन डे विश्वचषकादरम्यान भेटलो होतो. मी इमाद वसीमला अंडर-१९ विश्वचषकाच्या दिवसांपासून ओळखत होतो आणि मँचेस्टरमधील सामन्यानंतर तो म्हणाला की बाबरला तुझ्याशी बोलायचं आहे."

"मग माझी बाबरसोबत भेट झाली आणि आम्ही खेळाबद्दल बोललो. पहिल्या दिवसापासून मला त्याच्यामध्ये खूप आदर दिसला आणि तो त्याने कधीच बदलला नाही. कदाचित सर्व फॉरमॅटमध्ये तो जगातील अव्वल फलंदाज असला तरी तो आदर देतो. तो सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे आणि त्याला खेळताना पाहणे मला नेहमीच आवडते", असे विराटने सांगितले.

मागील काही कालावधीपासून बाबर आणि विराटची तुलना केली जाते. विराट खराब फॉर्मचा सामना करत आहे, तर बाबर सातत्याने चांगली कामगिरी करतो आहे. या मुलाखतीत विराटने ज्या सामन्याबद्दल भाष्य केले, तो सामना भारताने ८९ धावांनी जिंकला होता. कोहलीने या सामन्यात ६५ चेंडूत ७७ धावांची खेळी केली होती.

पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच त्याने वन डे क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने हाशिम आमला आणि व्हिव्हि रिचर्ड्स यांना मागे टाकले. बाबर सध्या वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

आगामी काळात विराट कोहली आणि बाबर आझम यांचा सामना आशिया चषकात होणार आहे. २ सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत.

तर, ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वन डे विश्वचषकात १४ ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे.