IND vs ZIM : KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ सालचा विक्रम मोडला, Deepak Hoodaने इतिहास घडविला!

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : भारतीय संघाने दुसरी वन डे मॅच ५ विकेट्स राखून जिंकली आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : भारतीय संघाने दुसरी वन डे मॅच ५ विकेट्स राखून जिंकली आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) मिळालेल्या संधीचं सोनं करताना ३ विकेट्स घेतल्या. शिखर धवन, शुबमन गिल, संजू सॅमसन व दीपक हुडा यांनी चांगली फलंदाजी करून संघाचा विजय पक्का केला. KL Rahul याच्या नेतृत्वाखालील भारताचा हा पहिलाच मालिका विजय ठरला, पण या विजयाने १९८३सालचा विक्रम मोडला गेला. दीपक हुडानेही इतिहास घडविला, तर संजू सॅमसनने MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी केली.

सीन विलियम्स ( ४२) व रायन बर्ल ( ४१*) यांनी झिम्बाब्वेकडून संघर्ष केला, परंतु त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १६१ धावांत माघारी परतला. शार्दूल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी न मिळाल्याने लोकेश आज ओपनिंगला आला, परंतु ५ चेंडूत १ धाव करून तो व्हिक्टर एनयाऊचीच्या चेंडूवर LBW झाला. भारताला ५ धावांवर पहिला धक्का बसला. धवन व शुबमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी २९ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी करताना संघाला ट्रॅकवर आणले. धवन ३३ धावांवर बाद झाला.

इशान किशनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तोही बऱ्याच दिवसांनी मैदानावर उतरला होता. पण, तो ६ धावांवर बाद झाला. गिलसह त्याने ३४ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन व दीपक हुडा यांनी ५६ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. हुडा २५ धावांवर बाद झाला. संजूने षटकार खेचून भारताचा ५ विकेट्स राखून विजय पक्का केला. त्याने ३९ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.

दीपक हुडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तो खेळलेला प्रत्येक सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे सलग १६ ( वन डे व ट्वेंटी-२०) आंतरराष्ट्रीय सामन्यांत विजयाची चव चाखणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरलाय. याशिवाय भारताने सलग सातव्यांदा झिम्बाब्वेला ( २०१५ ते २०२२) ऑल आऊट केले आहे. हीवन डे क्रिकेटमधील भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी १९९७ ते ०२ आणि २००४ ते ०६ या कालावधीत भारताने सलग ५ सामन्यांत इंग्लंडला ऑल आऊट केले होते.

भारतीय संघाने ५ विकेट्स व १४६ चेंडू राखून हा सामना जिंकला. पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट गमावून सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवण्याच्या विक्रमात आजचा निकाल अव्वल झाला. यापूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने झिम्बाब्वेवरच १३५ चेंडू राखून विजय मिळवला होता. त्यानंतर १९९८ ( वि. बांगलादेश) व २००६ ( वि. इंग्लंड) यांच्याविरुद्ध अनुक्रमे १२४ व १२३ चेंडू राखून विजय मिळवला होता.

संजू सॅमसनला आजच्या सामन्यातील सामनावीर ठरवले गेले. त्याने नाबाद ४३ धावांची खेळी केली. आजच्या सामन्यात त्याने ४ षटकार खेचून महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. धोनीने २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एका वन डे सामन्यात ४ षटकार खेचले होते आणि भारतीय यष्टिरक्षकाची ती सर्वोत्तम कामगिरी होती.