IND vs NZ: "या मालिकेतून खूप काही शिकायला मिळेल पण...", पराभवानंतर शिखर धवनने गोलंदाजांवर फोडले खापर

IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत यजमान किवी संघाने विजय मिळवला. मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर असलेला भारतीय संघ आज मालिका वाचवण्यासाठी संघर्ष करत होता. मात्र पावसाने केलेल्या जोरदार बॅटिंगमुळे शिखर सेना चांगलीच धुवून निघाली आणि भारताला ०-१ ने मालिका गमवावी लागली.

खरं तर पावसामुळे मालिकेतील आजचा सामना रद्द करावा लागला त्यामुळे यजमान संघाने १-० ने मालिका जिंकली. भारताचा संपूर्ण संघ २१९ धावांत तंबूत परतला होता. श्रेयस अय्यरने सातत्य राखताना ४९ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरनेही शानदार खेळी करून ५१ धावा चोपल्या. रिषभ मात्र १६ चेंडूंत १० धावांवर माघारी परतला.

न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज गारद झाल्याचे पाहायला मिळाले. शुबमन गिल (१३) आणि शिखर धवन (२८) यांनी एकूण ३९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली. श्रेयसने वन डे क्रिकेटमधील फॉर्म कायम राखताना ५९ चेंडूंत ४९ धावांवर माघारी परतला.

यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. सूर्यकुमार यादव (६), दीपक हुडा (१२), दीपक चहर (१२) हेही फार कमाल करू शकले नाही. मात्र भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार शिखर धवनने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने शानदार खेळी करून भारताची धावसंख्या दोनशे पार नेली. त्याने ६४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५१ धावांची खेळी करताना ५ बाद १२५ धावांवरून संघाला २१९ धावांपर्यंत पोहोचवले. किवी संघाकडून ॲडम मिल्ने व डॅरील मिचेल यांनी सर्वाधिक ३ बळी पटकावले.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनीच भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. १७व्या षटकात उम्रान मलिकने भारताला पहिले यश मिळवून दिले. फिन ॲलन ५४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५७ धावांवर बाद झाला. खरं तर भारतीय संघाला संपूर्ण ५० षटके देखील खेळता आली नाहीत आणि संघ ४७.३ षटकांत केवळ २१९ धावांवर सर्वबाद झाला.

भारताने दिलेल्या २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाने शानदार सुरूवात केली. न्यूझीलंडकडून सलामीवीर फिन ॲलनने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर डेव्होन कॉन्वे ५१ चेंडूत ३८ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडच्या डावाचे १८वे षटक पूर्ण होताच पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला.

सामन्यानंतर कर्णधार शिखर धवनने म्हटले, "आमचा एक युवा संघ आहे. नक्कीच, बॉलिंग युनिटला गोलंदाजीबद्दल थोडे अधिक शिकण्याची आवश्यकता आहे. मला वाटते की आम्ही जरा जास्तच कमी प्रभावी गोलंदाजी केली. त्यामुळे गोलंदाजीत जरा जास्त सातत्य ठेवावे लागेल. शॉर्ट आणि बाऊन्स जास्त वापरावे लागतील. या अनुभवातून युवा गोलंदाज खूप काही शिकतील."

फलंदाजीबद्दल बोलताना धवनने म्हटले, "सुरुवातीच्या षटकांमध्ये स्विंग आणि सीम कमी झाल्यानंतर फलंदाजांसाठी मोठी भागीदारी करण्याची गरज भासू लागली. तसेच फलंदाजीतही भागीदारी आणखी वाढवण्याची गरज होती. सुरुवातीपासूनच खेळपट्टीवर उसळी होती. परंतु, जेव्हा तुम्ही न्यूझीलंडमध्ये येता तेव्हा तुम्हाला तेच अपेक्षित असते, खासकरून जेव्हा ढगाळ वातावरण असते तेव्हा हिच अपेक्षा केली जाते."

खरं तर भारतीय संघ ४ डिसेंबरपासून बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे, तिथे वनडे आणि कसोटी मालिका खेळवली जाईल. बांगलादेश दौऱ्यातून बहुतांश युवा खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील मालिकेतून आलेला अनुभव फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरेल.