India vs England, 4th Test : भारतीय गोलंदाजांनी चौथ्या ( narendra Modi stadium) कसोटीच्या पहिल्या दिवशी निर्विवाद वर्चस्व गाजवले. स्थानिक गोलंदाज अक्षर पटेल ( Axar Patel) यानं पुन्हा एकदा करिष्मा दाखवला. आर अश्विन ( R Ashwin), मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) आणि वॉशिंग्टन सुंदर यांचीही त्याला उत्तम साथ मिळाली.
इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर गडगडला आणि प्रत्युत्तरात भारतानं दिवसअखेर १ बाद २४ धावा केल्या. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर आहेत. बेन स्टोक्सचे ( Ben Stokes) अर्धशतक हीच इंग्लंडसाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल.
पण, पहिल्या दिवशी वातावरण तापलेलेही पाहायला मिळाले. बेन स्टोक्स आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यांच्यात शाब्दीक चकमक झाली. अम्पायरनी मध्यस्थी केल्यानं वाद तिथेच मिटला. पण, त्यामागचं कारण सामन्यानंतर समोर आलं. मोहम्मद सिराजनं ते सांगितलं.
इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याचा अडथळा १२ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) यानं दूर केला. त्यानंतर आलेल्या बेन स्टोक्सला ( Ben Stokes) सिराजनं डिवचलं आणि त्यानंतर विराट व स्टोक्स यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मैदानावरील पंचांना या दोघांचं भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी लागली.
सिराज म्हणाला,''ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. त्यामुळे संयम राखून गोलंदाजी करण्याचा आमचा प्लान होता. आपल्याकडे दोनच जलदगती गोलंदाज आहे, हे विराटनं आधीच सांगितले होते. त्यामुळे त्यांचा योग्य वापर करणे महत्त्वाचे होते आणि दोन षटकं टाकल्यानंतर विराटनं इशांतला दुसऱ्या एंडवरून गोलंदाजी करण्यासाठी रोटेट केलं.''
''ऑस्ट्रेलिया असो किंवा भारत मला १०० टक्के योगदान द्यायचेय हेच माहित आहे. त्यामुळे मी प्रत्येक चेंडू योग्य लाईन लेंथने टाकत होतो. त्या षटकात बाऊन्सर टाकल्यानंतर बेन स्टोक्सनं मला शिवी दिली. ( Ben Stokes mujhe gaali diya ), हे मी विराट भाईला सांगितले आणि त्यानं पुढील परिस्थिती हाताळली, असेही सिराज म्हणाला.