India vs England, 2nd Test : रेकॉर्ड ब्रेकर R Ashwin; घरच्या मैदानावर खऱ्या अर्थानं ठरला 'सिंघम'!

India vs England, 2nd Test Day 3 : सकाळच्या सत्रात भारताचे पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर आर अश्विन ( R Ashwin)आणि विराट कोहली ( Virat Kohli) या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना इंग्लंडच्या गोलंदाजांना हैराण केलं. अश्विननं आजच्या सामन्यात अनेक विक्रम मोडले. पण, चेपॉकवर आज केलेला त्यानं पराक्रम हा आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला करता आलेला नाही. त्यामुळेच भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर ( Wasim Jaffer) यानं त्याची तुलना बाजीराव सिंघम याच्याशी केली. ( R Ashwin is now the first Indian fifty and take a 5-wicket )

भारताला तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात पहिल्या काही षटकांतच दोन मोठे धक्के बसले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी तिसऱ्या दिवसाच्या डावाची सुरुवात केली. भारतानं पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी घेत विजयाचा मजबूत पाया रचला होता. त्यावर ही जोडी धावांचा डोंगर उभा करेल, असा अंदाज होता.

पण, सकाळच्या सत्रात घडले भलतेच. पुजारा ( ७) पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद होऊन माघारी परतला. ( Strange dismissal for Cheteshwar Pujara). त्यानंतर इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्स यानं सुरेख पद्धतीनं रोहित शर्माला यष्टिचीत करून माघारी पाठवले.

मोईन अलीच्या ( Moeen Ali) गोलंदाजीवर पुजारानं पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सिली पॉईंटला उभ्या असलेल्या ऑली पोपनं चेंडू अडवत लगेत यष्टिरक्षकाकडे फेकला आणि फोक्सनं पुजाराला धावबाद केलं. पुजारा क्रिजवर परतला, परंतु त्याच्या हातून बॅट निसटली होती आणि त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं. त्यानंतर जॅक लिचच्या गोलंदाजीवर फोक्सनं रोहितला ( २६) माघारी पाठवलं.

रिषभ पंतला ( ८) बढती देण्यात आली. पण, लिचनं त्याचा त्रिफळा उडवला. अजिंक्य रहाणेनं (१०) आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही मोईन अलीनं टिकू दिलं नाही. अक्षर पटेल ( ७) यालाही अलीनं बाद केलं.

आर अश्विन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करताना आघाडी २५०+ पार नेली आहे. इंग्लंडला एकदाही भारतात कसोटी सामन्यात २५०+ धावांचा पाठलाग करता आलेला नाही. यापूर्वी त्यांनी १९७२मध्ये दिल्लीत २०७ धावा आणि १९८४मध्ये दिल्लीत १२५ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

आर अश्विननं या सामन्यात विराटसह ७व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. इंग्लंडविरुद्ध १०००+ धावा आणि १०० विकेट्स घेणारा तो सातवा खेळाडू ठरला. यापूर्वी जॉर्ज गिफन ( ऑस्ट्रेलिया), माँटी नोबल ( ऑस्ट्रेलिया), गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज) , रिचर्ड हॅडली ( न्यूझीलंड), कपिल देव ( भारत), शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया), शॉन पोलॉक ( दक्षिण आफ्रिका) यांनी अशी कामगिरी केली आहे

कपिल देव यांच्यानंतर इंग्लंडविरुद्ध १००० धावा व १०० विकेट्स घेणारा अश्विन हा पहिलाच भारतीय आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धही अशी कामगिरी केली आहे.

अश्विननं कसोटीतील १२वे अर्धशतक पूर्ण केलं. चेन्नईतील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले. अश्विननं एकाच कसोटीत पाच विकेट्स अन् अर्धशतक अशी कामगिरी सहावेळा केली आहे. २०११ ( वि. वेस्ट इंडिज, वानखेडे), २०१५ ( वि. दक्षिण आफ्रिका, दिल्ली), २०१६ ( वि. वेस्ट इंडिज, नॉर्थ साऊंड), २०१६ ( वि. इंग्लंड, विशाखापट्टणम), २०१७ ( वि. श्रीलंका, कोलंबो) साली अश्विननं अशी कामगिरी केली आहे.

चेपॉकवर एकाच कसोटीत पाच विकेट्स व अर्धशतक करणारा आर अश्विन तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८०मध्ये कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध आणि २०१६मध्ये रवींद्र जडेजानं इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.