Hardik Pandya Angry, IND vs NZ 2nd T20: "हे काय चाललंय, दुसऱ्यांदा परत तसंच..."; हार्दिक पांड्याचा पाराच चढला, पाहा कोणावर संतापला

फलंदाज, गोलंदाज किंवा फिल्डर नव्हे, या वेळी हार्दिक वेगळ्याच गोष्टीवर भडकला

Hardik Pandya Angry, IND vs NZ 2nd T20: न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने कसाबसा दुसरा सामना जिंकला आणि मालिकेत बरोबरी साधली. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या टीम इंडियाने लखनौमध्ये विजय मिळवला आणि मालिका १-१ अशी बरोबीत आणली.

लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर रविवारी दुसरा सामना झाला. त्यात फलंदाजांना धावा करताना खूप कष्ट पडले. फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडने प्रथम खेळताना २० षटके खेळली आणि भारतालाही १०० धावा करण्यासाठी १९.५ षटके खेळावी लागली.

भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल या तिघांनी सात पैकी चार बळी टिपले. न्यूझीलंडकडूनही मिचेल सँटनर आणि इश सोढी या फिरकी जोडीने ८ षटकांत केवळ ४४ धावा दिल्या. सूर्यकुमार यादवमुळे भारताने कसाबसा सामना जिंकला.

या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अहमदाबादमध्ये १ फेब्रुवारीला खेळवला जाईल. टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधली असली तरी कर्णधार हार्दिक पांड्या खूप नाराज दिसला. रांचीनंतर त्याला लखनौमध्ये तेच पाहायला मिळाले, ज्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली. हार्दिकच्या नाराजीचे नक्की कारण काय... जाणून घेऊया.

हार्दिक पांड्याच्या रागाचे कारण फलंदाज, गोलंदाज किंवा फिल्डर्स नव्हे तर सामन्यासाठी वापरलेली खेळपट्टी होती. दोन्ही सामन्यातील खेळपट्टी T20 साठी नसून कसोटीच्या चौथ्या-पाचव्या दिवशीच्या सामन्यासारखी होती, असे दिसून आले.

सामन्यानंतर हार्दिक पांड्याने याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. "खरे सांगायचे तर ती एक धक्कादायक खेळपट्टी होती. (अशा खेळपट्टीवर) आम्ही दोन्ही सामने खेळलो आहोत. अशा आव्हानात्मक किंवा कठीण प्रकारच्या खेळपट्टीची मला किंवा आमच्या संघाला कोणतीही अडचण नाही, मी त्यासाठी तयार आहे. पण हे काय चाललंय... या दोन्ही खेळपट्ट्या टी२० साठी बनवल्या गेल्या नव्हत्या," अशा शब्दांत हार्दिकने राग व्यक्त केला.