IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?

आयपीएल २०२५ च्या विजेतापदाचा खिताब जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमसाठी कर्नाटकातील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विक्ट्री परेड आणि ग्रँड सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली होती. त्यातच या विजयी सोहळ्याला मोठे गालबोट लागले. स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा जीव गेला.

या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. कर्नाटक सरकारने या प्रकाराची दखल घेत आरसीबी फ्रेंचायसीसह आयोजकांवर गुन्हा दाखल केला. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या २ अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणी अटकेचीही कारवाई झाली आहे. त्यामुळे आरसीबी टीमवर कारवाईची ग्रहण लागले आहे.

या प्रकरणी आरसीबीला पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या सीरिजमध्ये सहभागी व्हायला द्यायचे की नाही हा मोठा निर्णय बीसीसीआय घेऊ शकते. RCB च्या विक्ट्री परेड आणि या सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे जर या प्रकारात आरसीबी टीम प्रशासन दोषी आढळले तर BCCI यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे गरजेचे आहे.

IPL मध्ये जितक्या फ्रेंचायसी आहेत त्या व्यावसायिक भागीदारी म्हणून काम करत आहेत. परंतु त्या भागीदारीत बीसीसीआयकडून कॉन्ट्रॅक्टवर नियंत्रण ठेवले जाते. त्यात करारात पब्लिक सेफ्टीपासून अनेक नियमांचा समावेश आहे. जर तपास यंत्रणेकडून आरसीबी मॅनेजमेंटला जबाबदार धरले गेले तर बीसीसीआयला आयपीएलची विश्वासर्हता कायम ठेवण्यासाठी आरसीबीवर कठोर कारवाई करण्यास भाग पडेल.

आरसीबीच्या या विजयी जल्लोषात ११ लोकांचा जीव गेल्याने बीसीसीआयही नाराज आहे. या प्रकारावर आम्ही गप्प बसणार नाही. अशा घटना रोखण्यासाठी लवकरच नवीन कायदा बनवू अशी माहितीही BCCI चे सचिव देवजित सैकिया यांनी दिली आहे.

त्याशिवाय हा सोहळा आरसीबीचे खासगी आयोजन होते, परंतु बीसीसीआय म्हणून आम्ही भारतातील क्रिकेटला जबाबदार आहोत. त्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत त्यासाठी आम्हाला काहीतरी ठोस करावे लागेल असंही बीसीसीआयने स्पष्ट सांगितले आहे.

४ जूनला घडलेल्या या प्रकारात आरसीबी टीमचे मार्केटिंग हेड निखिल सोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे. निखिलसोबतच अन्य ३ जण अटकेत आहेत. निखिल सोसले मुंबईला पळण्याच्या तयारीत असताना विमानतळावर त्यांना अटक केली. तर कर्नाटक क्रिकेट संघाचे सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम हे फरार आहेत.

बंगळुरूत ४ जून रोजी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्येही संताप आहे. या स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला त्याशिवाय ५० हून अधिक जखमी झालेत. कर्नाटक सरकार आणि आरसीबी टीमकडूनही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना जिंकल्यानंतर आरसीबीने विजयी परेडसाठी घाई केली परंतु पोलीस त्यासाठी तयार नव्हती. या संपूर्ण प्रकरणी हायकोर्टानेही फटकारले आहे. १० जून रोजी या घटनेच्या चौकशीचा रिपोर्ट देण्याचे आदेश दिलेत. रविवारी ८ जून रोजी सोहळ्याचे आयोजन करा अशी सूचना पोलिसांनी दिली होती मग हा सोहळा ४ जूनलाच करण्याचा कुणी हट्ट धरला हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या घटनेची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली आहे. लवकर त्यांच्यात या विषयावर चर्चा होईल. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही बंगळुरूतील घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. अशाप्रकारच्या रोड शो कार्यक्रमाला मी विरोध करतो. आमच्यासाठी जल्लोषापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे असं गंभीर यांनी सांगितले.