Join us  

सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले

RCBचा स्टार फलंदाज विराटला KKRचा गोलंदाज हर्षित राणाने टाकलेल्या स्लोव्ह फुल टॉसवर झेलबाद दिले गेले होते. हा नो बॉल असल्याचा विराटचा दावा होता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 3:26 PM

Open in App

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) याने विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अम्पायरशी वाद घालण्याच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील IPL 2024 च्या लढतीत वादग्रस्त बाद झाल्यानंतर विराटने अम्पायरसोबत विराटने हुज्जत घातली होती. RCBचा स्टार फलंदाज विराटला KKRचा गोलंदाज हर्षित राणाने टाकलेल्या स्लोव्ह फुल टॉसवर झेलबाद दिले गेले होते. हा नो बॉल असल्याचा विराटचा दावा होता आणि त्यानंतर निर्णय तिसऱ्या अम्पायरकडे गेला. त्यांनीही बाद दिल्यानंतर विराट ड्रेसिंग रुमकडे जाताना मैदानावरील अम्पायरसोबत भांडला. त्याच्या या कृतीमुळे बीसीसीआयने ५० टक्के मॅच फी दंड म्हणून वसूल केली. 

आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय

क्रिकेटच्या नियमांनुसार हा निर्णय योग्य असल्याचे प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सने नियमासह चाहत्यांना समजावूनही सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की चेंडू खेळण्यासाठी कोहली त्याच्या क्रीजच्या बाहेर उभा होता आणि तो क्रिझमध्ये उभा राहिला असता तर डिपिंग बॉल त्याच्या कमरेच्या खाली गेला असता.  दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध RCB च्या आजच्या लढतीच्या आधी वीरेंद्र सेहवागने 'क्लब प्रेरी फायर' पॉडकास्टवर विराटच्या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

 “तो बाद होता किंवा नव्हता किंवा तो नो बॉल होता किंवा नव्हता, हा प्रश्नच नाही.  विराटने अम्पायरचा आदर केला पाहिजे. एकदा तुम्हाला आऊट दिल्यानंतर तुम्ही तुमचे डोके खाली करून गप्प ड्रेसिंग रूममध्ये परत यावे.  अम्पायरशी वाद घालणे योग्य नाही. त्याला अम्पायरशी चर्चा करण्याचा अधिकार आहे, पण त्याने जे केले ते योग्य नव्हते. हेच मी सचिन तेंडुलकरकडून शिकलो. त्याच्या कारकिर्दीत अनेक चुकीचे निर्णयाला सामोरे जाऊनही त्याने कधीची अम्पायरसोबत वाद घातला नाही,” असे सेहवाग द क्लब प्रेरी फायरवर म्हणाला.

“अनेकदा असे घडले आहे की विराट बाद असतानाही पंचांनी त्याला बाद दिले नाही. अशीही उदाहरणे आहेत जेव्हा तो नाबाद होता पण त्याला बाद दिले गेले होते. ही मानवी चूक आहे आणि प्रत्येक माणूस चूक करतो. तुम्ही अम्पायरचा निर्णय बदलू शकत नाही आणि सर्वोत्तम गोष्ट म्हणजे तो स्वीकारणे आणि परत ड्रेसिंग रुममध्ये जाणे, ” असेही सेहवाग पुढे म्हणाला.

टॅग्स :आयपीएल २०२४विरेंद्र सेहवागविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरऑफ द फिल्ड