Join us

कोहलीचे ‘विराट’ स्थान कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीमध्ये भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 15:57 IST

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीमध्ये भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले आहे. कोहलीचे सध्या एकूण ८७३ गुण आहे. तसेच, रविवारपासून सुरु होत असलेल्या श्रीलंकेविरुध्दच्या मालिकेत चमकदार कामगिरीसह आपले अग्रस्थान आणखी मजबूत करण्याची संधी त्याच्याकडे असेल. शिवाय द्वितीय स्थान असलेल्या आॅस्टेÑलियाच्या डेव्हिड वॉर्नरलाही मोठ्या अंतराने मागे टाकण्याची संधी कोहलीकडे असेल. सध्या कोहली आणि वॉर्नर यांच्यामध्ये १२ गुणांचे अंतर आहे.अन्य भारतीय फलंदाजांमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (१२), आक्रमक सलामीवीर शिखर धवन (१३) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (१४) यांनीही अव्वल १५ स्थानांमध्ये स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे, दुसरीकडे गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची निराशा झाली आहे. अव्वल दहामध्ये भारताच्या एकाही गोलंदाजाचा समावेश नाही. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (१३) अव्वल १५ स्थानांमध्ये असलेला एकमेव भारतीय आहे. त्याचप्रमाणे, सांघिक क्रमवारीमध्ये भारताचे तिसरे स्थान कायम राहिले आहे. आपले तिसरे स्थान कायम राखण्यासाठी भारताला लंकेविरुध्दची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकणे आवश्यक आहे. भारताचे सध्या ११४ गुण असून जर लंकेविरुध्दची मालिका ३-२ अशी जरी जिंकली, तरी भारताला एका गुणाचा फटका बसेल. यानुसार दशांशच्या फरकाने भारतीय संघ चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंडहून पिछाडीवर पडेल. त्यामुळे, भारताला ही मालिका ४-१ किंवा ५-० अशा मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे.त्याचवेळी, भारताविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करुन २०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी थेट प्रवेश करण्यावर यजमान श्रीलंकेचा भर असेल. आगामी विश्वचषक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी श्रीलंकेला भारताविरुद्ध किमान दोन सामने जिंकणे अनिवार्य आहे. विश्वचषक स्पर्धेतील थेट प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. श्रीलंका सध्या ८८ गुणांसह आठव्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजपेक्षा श्रीलंका संघ १० गुणांनी पुढे आहे. (वृत्तसंस्था)>विश्वचषक पात्रता स्पर्धेत आयसीसी क्रमवारीतील तळाच्या चार संघांना खेळावे लागेल. या स्पर्धेत आयसीसी जागतिक क्रिकेट लीग अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल चार संघ आणि आयसीसी जागतिक क्रिकेट लीग स्पर्धेतील अव्वल दोन संघांचाही सहभाग असेल. या पात्रता स्पर्धेतील अव्वल दोन संघ २०१९ साली होणाºया विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.