ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट ढवळून निघाले आहे. विराट कोहलीनं वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. त्याआधी वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या संघासाठी मेंटॉर म्हणून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची निवड केली. या निवडीमुळेच विराट नाराज झाल्याची चर्चा रंगली होती आणि म्हणूनच त्यानं कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले. पण, धोनीला मार्गदर्शक म्हणून नियुक्त करणे म्हणजे कोणालाही कमी लेखणे नाही, असे स्पष्ट मत बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ ( BCCI treasurer Arun Dhumal ) यांनी IANSकडे बोलताना व्यक्त केले.
महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा ब्लू जर्सीत दिसणार आहे, पंरतु यावेळी तो मेंटॉर म्हणून टीम इंडियासोबत असणार आहे. दोन वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. धुमाळ म्हणाले,''तो दिग्गज कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०१० व २०१६ चा आशिया कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. त्याचे विक्रम अविश्वसनीय आहेत. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो मेंटॉर म्हणून संघासोबत असणे खूप चांगली गोष्ट आहे.''
c''त्याचं संघात एक वेगळंच मानाचं स्थान आहे आणि सर्व त्याचा आदर करतात. त्याला मेंटॉर म्हणून नेमणे म्हणजे कोणाला कमी लेखणे, असं होत नाही. सर्वांनीही अविश्वसनीय कामगिरी केली आहे,''असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, त्यांना विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबतही विचारण्यात आले. हा निर्णय कोहलीचा स्वतःचा होता की बीसीसीआयनं त्याला भाग पाडले?; यावर ते म्हणाले,''बोर्डानं त्याला कर्णधारपद सोड असं विचारलंही नाही. तो सर्वस्वी त्याचाच निर्णय आहे. आम्ही त्याला पायऊतार होण्यास का सांगू?, तो चांगली कामगिरी करतोय.''