Join us  

विराटचा विजयरथ; दुसऱ्याही सामन्यात भारतानं उडवला कांगारुंचा धुव्वा, कुलदीपची कमाल, भुवनेश्वरची धमाल

गोलंदाजांनी केलेल्या धारधार माऱ्याच्या जोरावर भारतानं दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी पराभव केला. 253 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजापुढे हे लक्ष डोंगराएवढे भासले. ऑस्ट्रेलियाचा संघ 43.1 षटकांत 202 धांवापर्यंत मजल मारु शकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 9:51 PM

Open in App

कोलकाता, दि. 21 - गोलंदाजांनी केलेल्या धारधार माऱ्याच्या जोरावर भारतानं दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी पराभव केला. 253 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजापुढे हे लक्ष डोंगराएवढे भासले. ऑस्ट्रेलियाचा संघ 43.1 षटकांत 202 धांवापर्यंत मजल मारु शकला. या विजयासह भारतानं पाच वन-डे मालिकेत 2-0नं आघाडी घेतली. भारताकडून कुलदीप यादवनं हॅटट्रीक केली. तर भुवनेश्वर कुमारनंही तीन फलंदाजांना माघारी पाठवले. हार्दिक आणि चहलनं प्रत्येकी दोन बळी घेतले. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ (59) , स्टॉयनिस (62) आणि ट्रेविस हेड (39) यांचा अपवाद वगळता एकाही कांगारुला मोठी खेळी कऱण्यात यश आले नाही. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, अॅश्टन अॅगर आणि पॅट कमिन्सला, कार्टराईट आणि कुल्टर नाईल यांना यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडने कांगारुंचा डाव सावरण्याता प्रयत्न केला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. मात्र त्यांची खेळी पराभव वाचवू शकली नाही.

भारताकडून भुवनेश्वर कुमार, चहल आणि कुलदिप यादव यांनी टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सुरुवातीला भुवनेश्वरनं दोन धक्के दिले. तर डावाच्या मध्ये चहलनं दोघांची शिकार केली. भुवनेश्वर, चहल आणि पांड्यानं ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले असताना त्यात भर म्हणून कुलदिपनं सलग तीन फलंदाजांना बाद करत त्यांच कंबरडेच मोडलं. कोलकाताच्या इडन गार्डनवर रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला कुठेच डोक वर काढू दिलं नाही. 

त्यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 50 षटकांत सर्वबाद 252 धावा केल्या. भारताची सुरुवात खराब झाली. सलामिवीर रोहित शर्मा आज स्वस्तात सात धावांवर बाद झाला. त्याला नाथन कूल्टर नाईलने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.  रहाणे-विराटनं दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागिदारी केली. रहाणे अर्धशतकानंतर धावबाद झाला. रहाणेनं आपले 22 वे अर्धशतकसाजरे केलं. अजिंक्य रहाणे या मालिकेत चांगली कामगिरी करून संघात आपले स्थान कायम राखण्याचे प्रयत्न करत आहे. रहाणे बाद झाल्यानंतर मनिष पांडेही स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आलेल्या केदार जाधवनं काही उत्कृष्ट फटके मारले. मात्र तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानं 24 धावांची खेळी केली. एकीककडे कर्णधार विराट कोहली तळ ठोकून होता. मात्र त्याला योग्य ती साथ मिळत नसल्याचे दिसून येत होते. जाधव बाद झाल्यानंतर मैदानावर आलेला माजी कर्णधार धोनीही फारशी चमक दाखवू शकला नाही. तोही स्वस्तात बाद झाला.  

कर्णधार विराट कोहलीनं एकाबाजूनं दमदार खेळीच पर्दशन करताना 92 धावांची खेळी केली. दुर्देवानं त्याला शतकानं हुलकावणी दिली. विराट कोहलीच्या नावे30 शतके आहेत. सर्वाधिक शतकामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसह तो दुसऱ्या स्थानावर आहे.  शेवटच्या काही षटकांमध्ये भुवनेश्वर आणि हार्दिक पांड्यानं धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कोणतीही संधी दिली नाही. भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये सर्वबाद 252 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 253 धावांचे आव्हान दिलं आहे. गेल्या सामन्यातील विजयी संघच भारतानं कायम ठेवला आहे. 

विराटचा विक्रम थोडक्यात हुकला - ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहली आपल्या वन-डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 31 वे शतक करता करता राहिला. विराटनं 107 चेंडूचा सामना करताना 8 चौकारांच्या मदतीनं 92 धावा ठोकल्या. विराटनं आज जर शतक झळकावलं आसते तर ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडत सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असती. सर्वाधिक शतके भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहेत. सचिननं वन-डेमध्ये 49 शतके झळकावली आहेत.