Join us  

ट्विस्ट : रवी शास्त्रींच्या करारात वाढ नाही? प्रशिक्षकासाठी लवकरच जाहीरात

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक आणि साहाय्यकांच्या कराराबाबत ट्विस्ट आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 1:21 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाच्या कामगिरीवर खूश असल्यामुळे मुख्य प्रशिक्षक आणि साहाय्यकांच्या करारात वाढ होण्याचा आग्रह काही दिवसांपुर्वी प्रशासकीय समितीनं धरला होता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि प्रशासकीय समितीच्या झालेल्या बैठकीनंतर सर्व सूत्र हलली. असा कोणताच प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला नसल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर नवीन प्रशिक्षकाचा शोध बीसीसीआय करणार असल्याच्या शक्यता बळावली आहे.

शास्त्री यांच्यासह गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचाही करार जुलै महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. ''बीसीसीआयच्या बैठकीत रवी शास्त्री यांच्या कराराचा मुद्दा चर्चिला गेलेला नाही आणि तो चर्चेचा अजेंडात नव्हता,''असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर नवीन प्रशिक्षक निवडीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ESPNCricinfo नं दिलेल्या वृत्तानुसार वर्ल्ड कप स्पर्धेनंतर बीसीसीआय या पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक मिळतील अशी शक्यात आहे. 

पण, प्रशिक्षकासाठी योग्य उमेदवार न मिळाल्यास विंडीज दौऱ्यापर्यंत शास्त्रींना मुदतवाढ देण्यात येईल. नवीन प्रशिक्षकाची निवड करताना बीसीसीआय पुन्हा क्रिकेट सल्लागार समितीचा सल्लाही घेईल. या समितीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांचा समावेश आहे. 

भारतीय संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीने प्रशासकीय समितीला प्रभावित केले आहे. त्यामुळेच शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखालील साहाय्यक टीमलाच पुन्हा ही जबाबदारी द्यावी असा त्यांचा आग्रह होता. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक वन डे व कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर न्यूझीलंडला त्यांच्याच घरी नमवले. भारतीय संघाने २०१८ चा आशिया कपही जिंकला आणि वेस्ट इंडीजला वन डे, कसोटी व ट्वेंटी-२० मालिकेत लोळवले.  त्यानुसार शास्त्री आणि त्यांच्या साहायक्कांना २०२० च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. 

टॅग्स :रवी शास्त्रीबीसीसीआयवर्ल्ड कप २०१९