Join us  

तब्बल १२ हजार ४५ दिवसांनी गाबामध्ये फडकविला भारताचा तिरंगा; ऑस्ट्रेलियाचही केलं 'गर्वहरण'

ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये (गाबा) ३३ वर्षांपासून म्हणजेच १९८८ कधीही पराभूत झालेला नव्हता

By मुकेश चव्हाण | Published: January 19, 2021 3:28 PM

Open in App

ब्रिस्बेन: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे. दुखापतींवर मात करत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या भारतीय संघाने कांगारुंना चितपट करुन मिळवलेल्या विजयाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. 

ऋषभ पंतने ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी ९६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार खेचला आणि भारताला कसोटी जिंकली. 

ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये (गाबा) ३३ वर्षांपासून म्हणजेच १९८८ कधीही पराभूत झालेला नव्हता आणि भारताविरुद्ध गाबाच्या मैदानात एकही सामना गमावलेला नव्हता. परंतु अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं. ३३ वर्षांचे दिवस मोजायले गेलो, तर १२ हजार ०४ दिवसांनी भारताने गाबामध्ये तिरंगा फडकविला असं म्हणावं लागेल. 

तत्पूर्वी, टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला.  प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले. 

शुबमन गिलने १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावा करून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. ऑसी गोलंदाजांचा मारा शरिरावर झेलूनही चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी करताना टीम इंडियाच्या विजयासाठी प्रयत्न केले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही.  रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभ पंतला बढती देण्यात आली, पण त्यानेही दमदार खेळी केली. पुजारानं चौथ्या विकेटसाठी पंतसह अर्धशतकी भागीदारी केली.  नवीन चेंडू घेतल्यानंतर पॅट कमिन्सनं पहिल्याच षटकात पुजाराची विकेट घेतली. अम्पायर कॉलमुळे पुजाराला २११ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं ५६ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर रिषभनं आक्रमक खेळ केला. त्यानं अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाच्या विजयासाठीचे प्रयत्न केले.  

पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी १५ षटकांचा खेळ शिल्लक करताना टीम इंडिया बाजी मारेल असा विश्वास वाटत होता. पण, मयांक अग्रवालच्या विकेटनं ऑस्ट्रेलियन संघाला बूस्ट मिळवून दिला. मयांक ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रिषभ व वॉशिंग्टन सुंदर यांनी खिंड लढवत सामना जिंकला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली.  रिषभ पंत  १३८ चेंडूंत ८९ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ही मालिका २-१अशी जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली. या विजयानंतर अजिंक्यनं विजयाची ट्रॉफी पदार्पणवीर टी नटराजनच्या हाती दिली. तत्पूर्वी, टीम इंडियानं स्वाक्षरी केलेली जर्सी १००वा कसोटी खेळणाऱ्या नॅथन लियॉनला भेट दिली.

प्रत्येक सेशनमध्ये नवा हिरो मिळालाय- सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिननेही भारतीय संघांचे तोंड भरुन कौतूक केलंय. भारताच्या विजयी क्षणाचा फोटो ट्विट करत सचिनने संपूर्ण टीमचं कौतुक केलंय. "प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला नवा हिरो पाहायला मिळालाय. जेव्हा आपल्याला दुखापतींना सामोरं जावं लागलं. तेव्हा आपण आणखी खंबीरपणे उभं राहिलो. स्वत:च्या सीमांना ओलांडून निष्काळजीपणे नव्हे, तर निर्भयतेने क्रिकेट खेळलो. दुखापती आणि अनिश्चिततेचा सामना अतिशय संयम व आत्मविश्वासाने केला. आतापर्यंतच्या सर्वात उत्कृष्ट मालिका विजयांपैकी हा एक विजय आहे. भारतीय संघाचे अभिनंदन", असं ट्विट सचिननं केलं आहे. 

टॅग्स :भारतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयइतिहास