Join us  

... तर कोहली 'ही' कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरेल

कोहलीने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये तीन शतके लगावली आहेत. पण कोहलीने जर अखेरच्या सामन्यात शतक लगावले तर एका मालिकेत चार शतके लगावणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 6:06 PM

Open in App
ठळक मुद्देएकाचवेळी 19 खेळाडूंना पिछाडीवर टाकणार

नवी दिल्ली, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: भारताचा कर्णधार विराट कोहलीने सध्या धावांची टांकसाळ उघडली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये कोहलीने शतके झळकावली होती. त्यावेळीही कोहलीने बरेच विक्रम रचले होते. पण आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या लढतीत कोहलीला  एकाचवेळी 19 खेळाडूंना पिछाडीवर टाकण्याची संधी असेल. त्याचबरोबर 'ही' कामगिरी करणारा तो क्रिकेट जगतातील पहिला फलंदाज ठरणार आहे.

कोहलीने पहिल्या सामन्यात दमदार शतक झळकावले होते आणि भारताने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सामन्यातही कोहलीने शतक झळकावत दहा हजार धावांचा पल्ला गाठला होता. यावेळी सर्वात जलद दहा हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. त्याचबरोबर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही त्याने मागे टाकले होते. पण या सामन्यात भारताला विजय मिळवता आला नव्हता. शाई होपने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावल्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातही कोहलीने शतक झळकावले होते, पण भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

कोहलीने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये तीन शतके लगावली आहेत. पण कोहलीने जर अखेरच्या सामन्यात शतक लगावले तर एका मालिकेत चार शतके लगावणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरणार आहे. आतापर्यंत तब्बल 19 खेळाडूंनी एका मालिकेत तीन शतके लगावली आहेत. त्यामुळे कोहलीने जर अखेरच्या सामन्यात शतक लगावले तर तो तब्बल 19 फलंदाजांना एकाच वेळी मागे टाकू शकतो.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज