नागपूर : श्रेयस गोपालची नाबाद दीडशतकी खेळी आणि चार सहका-यांच्या अर्धशतकी खेळीमुळे कर्नाटकने रणजी उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावात ५७० धावा उभारून तिस-या दिवसअखेर तब्बल ३९७ धावांची आघाडी मिळविली.
जामठ्याच्या व्हीसीए स्टेडियमवर २४ वर्षांच्या श्रेयसने २७४ चेंडू टोलवित ११ चौकारांसह नाबाद १५० धावा ठोकल्या. याशिवाय ११ व्या स्थानावर आलेला अरविंद श्रीनाथसह (५१) चार जणांनी अर्धशतके झळकविली. ४१ वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईच्या दुस-या डावाची सुरुवातही अडखळत झाली. ४४ षटकांत १२० धावांत तीन फलंदाज गमवावे लागले. सूर्यकुमार यादव ५५ आणि आकाश पारकर तीन धावांवर नाबाद आहेत.
सलामीवीर पृथ्वी शॉ (१४), जय बिस्टा (२०), अखिल हेरवाडकर (२६) हे झटपट बाद झाले. मुंबई संघ कर्नाटकच्या तुलनेत अद्याप २७७ धावांनी मागे असून सात फलंदाज शिल्लक आहेत. कालच्या ६ बाद ३९५ वरून आज पुढे खेळ करणा-या कर्नाटकचा कर्णधार आर. विनयकुमार याने ३१ धावा केल्या. कृष्णप्पा गौतमने ३८ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून शिवम दुबे याने पाच, मल्होत्राने तीन आणि धवल कुलकर्णी याने दोन गडी बाद केले. (वृत्तसंस्था)