कोलंबो - श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याचे क्रिकेट करिअर यशस्वी राहीले. हा तुफानी फटकेबाजी करणारा डावखुरा फलंदाज माहिती नाही असा क्रिकेटप्रेमी सापडणार नाही. याच जयसुर्याला सध्या धड उभं देखील राहता येत नाही, त्याला कुबड्यांचा आधार घेतल्याशिवाय त्याला पाऊलही पुढे टाकता येत नाहीये. त्याच्या या अवस्थेकडे बघितल्यानंतर हा तोच खेळाडू आहे का ज्याने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडला होता असा प्रश्न पडतोय.
जयसूर्याने क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर श्रीलंकेच्या निवड समितीचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं, मात्र त्याच्या कार्यकाळातील निर्णयांमुळे संघाच्या कामगिरीवर वाईट परिणाम झाल्याचा डाग त्याच्यावर लावण्यात आला.
श्रीलंकंन माध्यमांच्या वृत्तानुसार, जयसुर्या गुडघ्याच्या त्रासाने त्रस्त आहे, गुडघ्याचं ऑपरेशन करण्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियाला जावं लागणार आहे. मेलबर्न इथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यावर देखरेखीखाली पुढील उपचार केले जातील, या उपचारांनंतर तो पुन्हा पायावर उभा राहतो की नाही हे कळू शकेल.
जयसूर्याने एकदिवसीय सामन्यात 13 हजार तर कसोटी सामन्यात 6973 धावा ठोकल्या आहेत. स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या या फलंदाजाला आज चालताही येणं मुश्कील झाल्याचं बघितल्याने अनेकांना वाईट वाटलं आहे.