Join us  

'विराट -शास्त्री बोलतील तीच पूर्व दिशा, निवड समिती नावापुरतीच'

भारतीय क्रिकेट संघाची सध्याची निवड समिती ही कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या तालावर नाचणारी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 7:06 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाची सध्याची निवड समिती ही कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या तालावर नाचणारी आहे. त्यांच्याकडे विराट व शास्त्री यांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठीचा पुरेसा अनुभव नाही, अशी टीका भारताचे माजी निवड समिती सदस्य सय्यद किरमानी यांनी केली. करुण नायर व मुरली विजय यांना कसोटी संघातून बाहेर काढल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर बोलताना हे भाष्य केले. 

या दोघांनीही संघाबाहेर ठेवताना निवड समितीने आपल्याशी कोणताही संवाद केला नसल्याचे सांगितले होते. त्यांच्या या दाव्याचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी खंडन केले. या वादाबाबत किरमानी यांना विचारले असता ते म्हणाले,'' मला विचाराल तर रवी शास्त्री हे मुख्य प्रशिक्षक असल्यामुळे तेच निवड समिती प्रमुख आहेत. ते आणि कर्णधार विराट अन्य वरिष्ठ सदस्यांशी चर्चा करून त्यांना हवा असलेला निर्णय निवड समितीला सांगून मोकळे होतात. सध्याच्या निवड समितीकडे अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळे विराट व शास्त्री यांच्या निर्णयावर मान डोलावण्यातच ते धन्यता मानतात.''

पाच सदस्यीय निवड समितीत आतंरराष्ट्रीय सामन्यांचा पुरेसा अनुभव नाही. प्रसाद यांनी 6 कसोटी व 17 वन डे सामने खेळले आहेत. उर्वरित सदस्यांमध्ये शरणदीप सिंह ( 2 कसोटी व 5 वन डे), देवांग गांधी ( 4 कसोटी व 3 वन डे) , जतिन परांजपे ( 4 वन डे) आणि गगन खोडा ( 2 वन डे) यांच्याकडेही अनुभवाची कमतरता आहे.  

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्री