Join us  

कसोटी संघातून डच्चू मिळालेल्या रोहित शर्माला आता करावं लागत आहे ज्युनिअर क्रिकेटपटूचे काम

पहिल्या कसोटी सामन्यात हितचा विचार न करता कोहलीने राहुलला संधी दिल्याचेच पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 7:20 PM

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात भांडण झाले आहे. त्यामुळेच पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला संधी दिली नाही, अशी तोफ चाहते कोहलीवर डागत आहेत. पण आता कसोटी संघातून डच्चू दिल्यानंतर रोहितला ज्युनिअर क्रिकेटपटूचे काम करायला सांगण्यात आले आहे. त्यामुळे रोहितसारखा अनुभवी आणि दादा फलंदाज आता एका ज्युनिअर क्रिकेटपटूचे काम करताना मैदानात दिसत आहे.

पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीनंतर जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघ जाहीर केला तेव्हा त्यामध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माचे नाव नसल्याचे दिसले आणि चाहत्यांना धक्का बसला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला संधी मिळेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण पहिल्या सामन्यासाठी रोहितचा विचार केला नसल्याचेच दिसते. कोहलीने यावेळी हनुमा विहारीला सलामीला न पाठवता लोकेश राहुलला संधी दिल्याचेही पाहायला मिळाले. रोहितचा विचार न करता कोहलीने राहुलला संधी दिल्याचेच पाहायला मिळाले.

एकदिवसीय आणि मर्यादीत षटकांचा सामना झाल्यावर युझवेंद्र चहल हा सर्वोत्तम खेळी साकारलेल्या खेळाडूंच्या मुलाखती घेतो. जास्त अनुभव नसल्याने चहलला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कसोटी सामन्यानंतर अनुनभवी चहलचे मुलाखत घेण्याचे काम रोहित करताना दिसला. या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेची कोहलीने मुलाखत घेतल्याचे पाहायला मिळाले.

रोहित शर्माला का दिला डच्चू, विराट कोहलीचा खुलासा: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला. पण या सामन्याच्या पहिल्याच दिवसापासून चर्चा आहे ती रोहित शर्माला डच्चू दिल्याची. आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात रोहितने दमदार कामिगिरी केली होती. पण तरीही रोहितला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्थान देण्यात आले नाही. याबाबतचा खुलासा भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. 

भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच कसोटीत वेस्ट इंडिजला पराभूत केले. भारताने 318 धावांनी यजमान विंडीजला नमवून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेच्या दमदार फलंदाजीच्या जारोवर भारताने हा विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीनेही अनेक विक्रम नावावर केले. या सामन्यात कोहलीचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. 

रोहितला पहिल्या कसोटी सामन्यात संधी का देण्यात आली नाही. या प्रश्नावर कोहलीने उत्तर दिले. तो म्हणाला की, " संघासाठी हनुमा विहारी हा महत्वाचा खेळाडू आहे. कारण तो कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो, त्याचबरोबर तो गोलंदाजीतही संघाला हातभार लावतो. त्यामुळे रोहितऐवजी विहारीला संघात स्थान देण्यात आले."

भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. उप कर्णधार अजिंक्य रहाणेची ( 102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी ( 93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. हे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला.

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज