नवी दिल्ली : वन-डे क्रिकेटमध्ये मोठी खेळी करण्याच्या क्षमतेमुळे रोहित शर्मा या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज ठरतो, असे मत भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी व्यक्त केले.
रोहितने वन-डे क्रिकेटमध्ये २९ शतके झळकाविली आहेत. त्यात ११ वेळा तो १४० पेक्षा अधिक धावा फटकावण्यात यशस्वी ठरला आहे. आपल्या कारकिर्दीत स्वत: आक्रमक सलामीवीर फलंदाज राहिलेले श्रीकांत म्हणाले, रोहित महान सलामीवीर फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल तीन किंवा पाचमध्ये राहील.
‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात श्रीकांत म्हणाले, ‘मी त्याला विश्व क्रिकेटमधील सर्वकालिक महान सलामीवीरांमध्ये स्थान देईन. रोहितची ही विशेषता आहे की, तो सहजपणे मोठी शतकी खेळतो किंवा द्विशतकी खेळी करतो. हे आश्चर्यचकित करणारे आहे.’ भारतातर्फे ४३ कसोटी व १४६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे ६० वर्षीय श्रीकांत म्हणाले, ‘एकदिवसीय सामन्यात जर तुम्ही १५०, १८० किंवा २०० धावा केल्या तर कल्पना करा संघाला तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकता. रोहितची ही महानता आहे.’