Join us  

आयुष्यात अपयशही पचवता आले पाहिजे -अश्विन

अपयशाच्यावेळी कदाचित तुमच्यासोबत कुणी नसतील, तरीही न डगमगता पुढे जाण्याचा मार्ग शोधणे यालाच आयुष्य म्हणतात, असा मोलाचा सल्ला भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने युवा खेळाडूंना दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 1:17 AM

Open in App

चेन्नई : काही कारणास्तव अपयश आले तर ते पचवणे शिकता आले पाहिजे. अपयशामुळे आयुष्य संपवणे हा अंतिम पर्याय नाही. यशाचे अनेक वाटेकरी होऊ शकतात, अपयशाच्यावेळी कदाचित तुमच्यासोबत कुणी नसतील, तरीही न डगमगता पुढे जाण्याचा मार्ग शोधणे यालाच आयुष्य म्हणतात, असा मोलाचा सल्ला भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने युवा खेळाडूंना दिला आहे.मुंबईचा २७ वर्षांचा युवा वेगवान गोलंदाज करण तिवारी याने सोमवारी स्वत:च्या घरी पंख्याला टांगून गळफास घेत आत्महत्या केली. क्लब खेळाडू असलेल्या करणला मुंबईच्या सिनियर संघात आणि आयपीएलमध्ये स्थान मिळवता आले नाही, याबद्दल निराश असलेल्या करणची मानसिक स्थिती बिघडली होती. द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याची हुबेहूब कॉपी असलेल्या करणला मुंबईचे सहकारी ‘ज्युनियर स्टेन’ असे संबोधायचे. या घटनेमुळे व्यथित झालेल्या अश्विनने ट्विट केले. करणला श्रद्धांजली वाहताना अश्विन म्हणाला,‘मुंबईच्या क्रिकेटपटूचा मृत्यू ही बोधप्रद घटना ठरावी. अपयश पचविणे कठीण झाल्याने करणने स्वत:चे आयुष्य संपवले. आजचे युवा उद्याचे भविष्य आहेत. आयुष्यात अपयश पचविणे त्यांनी शिकायला हवे. ज्या लोकांनी क्रिकेट किंवा अन्य क्षेत्रात यश मिळावले असेल त्यांनी शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर करिअरमध्ये विविध पर्याय शोधायलाच हवे. आयुष्य हा प्रवास आहे. तो सहज संपवता येणार नाही.’

टॅग्स :आर अश्विन