Join us  

रणजी क्रिकेट : गोलंदाजांच्या जोरावर मुंबईचे पुनरागमन, बाबा इंद्रजितचे शतक; मुंबईकर आकाशची अष्टपैलू खेळी

तळाच्या फलंदाजांनी केलेल्या संथ फलंदाजीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात आलेल्या अपयशानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेत तामिळनाडूविरुद्ध दुस-या दिवसअखेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 10:02 PM

Open in App

मुंबई - तळाच्या फलंदाजांनी केलेल्या संथ फलंदाजीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात आलेल्या अपयशानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेत तामिळनाडूविरुद्ध दुस-या दिवसअखेर चांगले पुनरागमन केले. पहिल्या डावात ३७४ धावा उभारलेल्या मुंबईकरांनी दिवसअखेर तामिळनाडूची ५ बाद २३९ धावा अशी अवस्था करुन पकड मिळवली. तामिळनाडू अजूनही १३५ धावांनी पिछाडीवर आहे.

बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या मुंबईने दुस-या दिवशी ७ बाद ३१४ धावांवरुन सुरुवात केली. पहिल्या दिवशी २० धावांवर नाबाद राहिलेल्या अष्टपैलू अभिषेक नायरवर मुंबईची मदार होती. परंतु, नायर एकही धावाची भर न टाकता बाद झाला. आपला दुसराच रणजी सामना खेळत असलेल्या आकाश पारकरने मात्र ४५ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ३३ धावांची खेळी करत मुंबईला समाधानकारक मजल मारुन दिली. 

यानंतर फलंदाजीला उतरलेल्या तामिळनाडूची सुरुवात अडखळती झाली. आकाशने चौथ्याच षटकात अभिनव मुकुंदचा (९) त्रिफळा उडवून तामिळनाडूच्या फलंदाजीला सुरुंग लावला. यानंतर हुकमी मुरली विजय (११), कौशिक गांधी (६) आणि विजय शंकर (१८) फारशी चमक न दाखवता बाद झाल्याने तामिळाडूचा डाव ४ बाद ६९ असा घसरला. यावेळी, मुंबईक फास आवळणार असेच चित्र होते. 

परंतु, एका बाजूने टिकून राहिलेल्या बाबा इंद्रजितने १७३ चेंडूत १२ चौकारांसह नाबाद १०५ धावांची खेळी करुन संघाची पडझड रोखली. त्याने अर्धशतक झळकावलेल्या वॉशिंग्टन सुंदरसह पाचव्या विकेटसाठी १५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सुंदरने ९१ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह ६९ धावा फटकावल्या. धवल कुलकर्णीने त्याला बाद करुन ही जोडी फोडली. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंद्रजित आणि स्टार अष्टपैलू रविचंद्रन आश्विन (८*) खेळपट्टीवर नाबाद होते. मुंबईकडून विजय गोहिलने २, तर धवल कुलकर्णी, आकाश पारकर, आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 

धावफलक : मुंबई (पहिला डाव) १०३.१ षटकात सर्वबाद ३७४ धावा (पृथ्वी शॉ १२३, श्रेयस अय्यर ५७, आदित्य तरे ५३; विजय शंकर ४/५२, रविचंद्रन आश्विन ३/७८, योमहेश २/६१)

तामिळनाडू (पहिला डाव) : ६५ षटकात ५ बाद २३९ धावा (बाबा इंद्रजित खेळत आहे १०५, वॉशिंग्टन सुंदर ६९; विजय गोहिल २/५८).

टॅग्स :रणजी चषक 2017क्रिकेट