मुंबईआयपीएलच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी नक्कीच वाखाणण्याजोगी राहिली. मात्र, या संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीकेचा धनी झाला आहे. 'पृथ्वी शॉचा अॅटीट्यूड हीच त्याच्यासाठीची मोठी समस्या ठरत आहे', असं विधान समालोचक आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानं केलं आहे.
दिल्लीच्या संघाने यंदा पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या संघाची आयपीएलमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण पृथ्वी शॉच्या बॅटमधून काही धावा निघू शकल्या नाहीत. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात अर्धशतकी खेळी वगळता पृथ्वीला संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानं यंदाच्या स्पर्धेत केवळ १७.२३ च्या सरासरीने २२८ धावा केल्या. आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनवरील एका व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉच्या याच सुमार कामगिरीचा समचार घेतला आहे.
'पृथ्वी शॉने चांगली सुरुवात केली. तो चांगले फटके मारतानाही दिसला होता. पण त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याची घसरण शुरू झाली आणि यातून तो सावरलाच नाही. पृथ्वी एक युवा फलंदाज आहे. त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. एखाद्या दिवशी धावांची सरासरी कमी झाली तर आपण समजू शकतो. पण त्यातून न सावरणं आणि स्वत:मध्ये बदल न करण्याची वृत्ती ठेवणं ही त्याच्यासाठी खूप मोठी समस्या ठरू शकते. खराब कामगिरीमुळे संघातील स्थान गमवावं लागल्यानंतरही त्यानं आपल्या खेळात बदल केला नाही', असं मत आकाश चोप्रा याने व्यक्त केलं आहे.
खराब कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाने पृथ्वी शॉला काही सामन्यांमध्ये संघाबाहेर ठेवलं होतं. त्यामुळे आयपीएलच्या पुढील मोसमात कदाचित पृथ्वी शॉला दिल्लीच्या संघाकडून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, असंही आकाश यावेळी म्हणाला.