Join us  

97 धावांवर खेळताना विराट डाव घोषित करायला होता तयार, ड्रेसिंग रुममध्ये केली होती विचारणा

कर्णधार विराट कोहली व्यक्तीगत हितापेक्षा संघ हिताला पहिलं प्राधान्य देत असल्याचं आणखी एक उदहारण समोर आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 5:37 PM

Open in App
ठळक मुद्दे श्रीलंकेच्या संघाला सर्वबाद करण्यासाठी भारतीय संघाकडे पुरेसा वेळही नव्हता. विराट व्यक्तीगत कामगिरीपेक्षा संघहिताला पहिले प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. 

कोलकाता - कर्णधार विराट कोहली व्यक्तीगत हितापेक्षा संघ हिताला पहिलं प्राधान्य देत असल्याचं आणखी एक उदहारण समोर आलं आहे. विराटने काल श्रीलंकेविरुद्ध नाबाद 104 धावा फटकावल्या. विराटचं कसोटी क्रिकेटमधील हे अठरावं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 व शतक ठरलं. कदाचित कालच्या सामन्यात विराटला करीयरमधील महत्वाचा 50 शतकांचा टप्पा गाठता आला नसता. 

विराट काल 97 धावांवर खेळत असताना त्याने ड्रेसिंग रुमकडे बघितले व प्रशिक्षक रवी शास्त्रींकडे डाव घोषित करु का ? म्हणून विचारणा केली. त्यावर शास्त्रींनी त्याला फलंदाजी चालू ठेवण्याचा सल्ला दिला. काल कसोटीचा अखेरचा दिवस होता आणि श्रीलंकेच्या संघाला सर्वबाद करण्यासाठी भारतीय संघाकडे पुरेसा वेळही नव्हता. शतकाच्या समीप पोहोचून डाव घोषित करण्याची तयारी दाखवण्याच्या या कृतीमधून विराट व्यक्तीगत कामगिरीपेक्षा संघहिताला पहिले प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. 

ड्रेसिंग रुमकडून मेसेज मिळाल्यानंतर षटकार ठोकून विराटने कसोटी क्रिकेटमधील 18 वे शतक झळकावले आणि लगेचच आठ बाद 352 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार म्हणून विराटचे हे 11 वे शतक होते. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते.  भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करुन भारताचा विजय दृष्टीपथात आणला होता. पण ऐनवेळी अपु-या प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आणि भारताच्या विजयाची संधी हुकली. त्यावेळी श्रीलंकेच्या सात बाद 75 धावा झाल्या होत्या. 

अखेरच्या काही षटकांमध्ये श्रीलंकेच्या ड्रेसिंगरुममध्ये तणाव स्पष्टपणे दिसत होता. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शामी एकाटोकाकडून भेदक गोलंदाजी केली. भुवनेश्वरने 10 षटकात आठ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शामीने दोन आणि उमेश यादवने एक गडी बाद केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने ठोकलं शतकांचं अर्धशतकभारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर बरोबर तुलना होत असलेल्या कर्णधार विराट कोहलीने सोमवारी क्रिकेट करीयरमध्ये आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात मोक्याच्या क्षणी शानदार शतक झळकवून विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवून दिला. विराटचे कसोटी क्रिकेटमधील हे 18 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 वे शतक ठरले. वनडेमध्ये विराटने आतापर्यंत 32 शतके झळकावली आहेत. संघाला गरज असताना विराटने नेहमीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.  

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट