नवी दिल्ली - भारतासोबत जुळलेल्या तीन सामन्यांच्या खेळपट्टीसोबत कथित छेडछाडीच्या स्टिंग आॅपरेशनवर बीसीसीआयने सावध प्रतिक्रिया दिली. बीसीसीआयने आज स्पष्ट केले, की या प्रकरणात अडकलेला माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस जर आयसीसीच्या चौकशीमध्ये दोषी आढळला तरच त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार करण्यात येईल.
हे स्टिंग आॅपरेशन अल जजिरा वाहिनीने केले आहे. ज्या सामन्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, त्यात भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान गालेमध्ये २६ ते २९ जुलै २०१७, भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान रांचीमध्ये १६ ते २० मार्च २०१७ आणि भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चेन्नईमध्ये १६ ते २० डिसेंबर २०१६ मध्ये खेळल्या गेलेल्या लढतींचा समावेश आहे.
गाले व चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता तर रांचीमध्ये खेळला गेलेला सामना अनिर्णीत संपला होता.
बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, ‘आयसीसीने चौकशी सुरू केलेली आहे. त्यांना चौकशी पूर्ण करू द्या आणि मॉरिसला दोषी ठरवू द्या. निर्णय झाल्यानंतरच बीसीसीआय कारवाई करेल.