नवी दिल्ली, दि. 7 - आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवण्यात यावी, असे आदेश केरळ हायकोर्टाने बीसीसीआयला दिले आहेत. 2013 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंद घातलेली आहे. त्याविरोधात श्रीसंतने मार्चमध्ये हायकोर्टात धाव घेतली होती. 2013 सालच्या आयपीएलमध्ये श्रीसंतसह अजित चंडेला आणि अंकित चव्हाण हे राजस्थान रॉयल्सचे तीन शिलेदार स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं 2015 साली तिघांसह 36 जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायालयाने निर्दोश मुक्तता केली असली तरी बीसीसीआयने मात्र श्रीसंतवरील बंदी कायम ठेवली आहे. याविरोधात त्याने कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आता कोर्टानेच बीसीसीआयला बंदी हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बीसीसीआय काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.