मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये लेग स्पिनरची कामगिरी उल्लेखनीय ठरत असल्यामुळे रविचंद्रन अश्विनसारख्या यशस्वी आॅफ स्पिनरलादेखील लेगस्पिन टाकणे भाग पडत असल्याचे मत महान खेळाडू कपिल देव यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमात कपिल म्हणाले,‘प्रत्येकाचा गोलंदाजी मारा वेगळा आहे. कुठल्या खेळपट्टीवर हा मारा होतो हेदेखील महत्त्वपूर्ण आहे. पण आयपीएलच्या पहिल्या दोन सत्रातील अपवाद वगळता लेगस्पिनर लीगमध्ये प्रभावी ठरल्याचे दिसते. ’
१९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे यशस्वी कर्णधार राहिलेले अष्टपैलू कपिल पुढे म्हणाले,‘प्रत्येक संघात एक प्रभावी लेगस्पिनर आहे. रविचंद्रन अश्विनसारखा गोलंदाजही आता लेगस्पिनवर भर देत आहे. ’
यंदाच्या सत्रात आतापर्यंत लेगस्पिन प्रभावी ठरले. मुंबई इंडियन्सचा नवा चेहरा मयंक मार्कंडेय याने तीन सामन्यात शानदार मारा केला. सनराइजर्सकडे राशिद खान, तर किंग्स पंजाबकडे मुजीबूर रहमान आहे. लेग स्पिनर्सच्या यशामागील रहस्य काय, असे विचारताच ५९ वर्षांचे कपिल पुढे म्हणाले,‘त्यांच्या यशामागील एक रहस्य सांगणे कठीण आहे पण लेगस्पिनर हे गडी बाद करणारे गोलंदाज आहेत. त्यांचे चेंडू आकलनापलीकडचे आहेत. अनेक फलंदाजांना ते समजले नाहीत. त्यामुळे प्रत्येक कर्णधार आपल्या संघात लेगस्पिनर ठेवणे पसंत करतो.’ राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्सकडून कर्ण शर्मा खेळला तर हरभजनसिंग याला बाहेर बसावे लागले. चेन्नई संघात आधीच इम्रान ताहिरसारखा अनुभवी लेगस्पिनर आहे, याकडे कपिल यांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)