Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्लीन स्वीपसाठी क्षेत्ररक्षण सुधारणे गरजेचे

भारताने आणखी एक दणदणीत विजय मिळवताना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. एक डाव आणि ५३ धावांनी विजय, इतका मोठा विजय दुसरा कोणता असू शकतो? पण तरी, काही चुकाही भारतीयांकडून झाल्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:58 IST

Open in App

- अयाझ मेमन भारताने आणखी एक दणदणीत विजय मिळवताना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. एक डाव आणि ५३ धावांनी विजय, इतका मोठा विजय दुसरा कोणता असू शकतो? पण तरी, काही चुकाही भारतीयांकडून झाल्या. परंतु, या सामन्यानंतर सर्वात मोठी खबर आली ती म्हणजे रवींद्र जडेजाला तिसऱ्या सामन्यातून निलंबित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या जडेजाचे भारताच्या विजयात मोलाचे योगदान राहिले. कारण एकवेळ लंकेचे फलंदाज चांगल्या स्थितीत दिसत होते आणि हा सामना पाचव्या दिवसापर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत होते. परंतु, जडेजाने तसे होऊ दिले नाही.जडेजासह असे झाले, की त्याने आपल्याच गोलंदाजीवर करुणारत्नेने फटकावलेला चेंडू अडवला आणि करुणारत्ने क्रीझच्या आतमध्ये असतानाही त्याच्या दिशेने चेंडू फेकला. ही पंचांनी धोकादायक ठरवली. विशेष म्हणजे याआधीही जडेजावर कारवाई झालेली असल्याने त्याच्या नावावर आधीच २ नकारात्मक गुण नोंदले होते. त्यात, या प्रसंगामुळे आणखी २ गुणांची भर पडली आणि आयसीसीच्या नियमाप्रमाणे जडेजावर पुढील सामन्यासाठी बंदी लादली गेली.दखल घेण्याची बाब म्हणजे, जर का जडेजाच्या नावावर आणखी नकारात्मक गुणांची भर पडली आणि ही संख्या ८वर गेली, तर जडेजा आणखी २ सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याला आता पुढे सांभाळून खेळावे लागले. एकूणच सध्या तरी तो तिसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही हे निश्चित आहे.सामन्याविषयी बोलायचे झाल्यास, भारताने नियंत्रित खेळ केला. पहिला सामना भारताने तीनशेहून अधिक धावांनी जिंकला. यानंतर एक डाव आणि ५३ धावांनी अशा मोठ्या फरकाने दुसरा सामना जिंकला. पण, माझ्या मते टॉप क्लास परफॉर्मन्स हा प्रत्येक क्षेत्रात झाला पाहिजे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये मला काहीच शंका नाही. परंतु, क्षेत्ररक्षणामध्ये भारताने अनेक चुका केल्या. फलंदाजीमध्ये पुजारा, रहाणेने शतक झळकावले. गोलंदाजीमध्ये सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तसेच, या वेळी कोहलीने हार्दिक पांड्याचाही चांगला वापर केला, ज्याने दोनबळी घेतले. पण क्षेत्ररक्षण विभागाकडून निराशा झाली. ३ ते ४ झेल सुटले, स्वत: विराट कोहलीने २ झेल सोडले. विशेष म्हणजे हे झेल कठीणही नव्हते.कसोटी सामन्यात कठीण झेल येतातच, त्यात शंका नाही. पण जे झेल सुटले ते नक्कीच कठीण नव्हते. मला वाटते की, जर वृद्धिमान साहाने जर का इतके चांगले यष्टीरक्षण केले नसते, तर भारताला अडचणी आल्या असत्या. त्यामुळेच, जर का भारताला या मालिकेत क्लीन स्वीप नोंदवायाचा असेल तर क्षेत्ररक्षणाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.