नवी दिल्ली : कुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे माझ्या गतस्मृतींना उजाळा लाभल्याची भावना फिरकीपटू हरभजनसिंगने व्यक्त केली.
मार्च २०११ चा तो प्रसंग, ईडन गार्डनचे मैदान, प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाच, कुलदीच्या जागी मी गोलंदाजी करीत होतो. कसोटी सामन्यातील ती हॅट्ट्रिक आजच्या सारखीच ऐतिहासिक ठरली होती. हे यश क्रिकेटपटूच्या कायम स्मरणात राहते. युवा स्पिनर म्हणून करिअरच्या सुरुवातीला हॅट्ट्रिक साधल्यास गोलंदाज म्हणून तुमचा आत्मविश्वास उंचावतो, असे भज्जीने नमूद केले. भज्जी पुढे म्हणाला, ‘ईडन गार्डनने माझ्यासारख्या गोलंदाजाला भरभरून दिले. या कामगिरीची क्रिकेट इतिहासात नोंद झाली आहे.’
‘कुलदीपने संघात स्थान निश्चित केले असून संघ व्यवस्थापनाला यापुढे आश्विन तसेच जडेजा यांना स्थान देताना बरीच कसरत करावी लागेल. युजवेंद्र चहलही फॉर्ममध्ये आहे. युवा गोलंदाज चांगली कामगिरी करीत असतील तर अनुभवी गोलंदाजांना संघात सामावून घेणे जड जाते. आश्विन, जडेजा यांना पुनरागमन करणे कठीण जाईल. कुलदीप आणि चहल दोघेही मनगटाचा वापर शिताफीने करतात. चहलकडे गुगली हा विशेष गुण आहे. कुलदीप चेंडू दोन्ही बाजूला वळवितो,’ असेही हरभजन म्हणाला.