Join us  

कोहली, ईशांत यांचे पुनरागमन निश्चित

कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पितृत्त्व रजा घेत मायदेशी परतला होता. ईशांत दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन करेल. त्याचवेळी, जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन यांना दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीतून बाहेर बसावे लागले. इंग्लंडविरुद्ध दोघेही तंदुरुस्त होतील, अशी आशा बाळगली जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 3:12 AM

Open in App

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी  माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करेल. यासाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांचे संघातील पुनरागमन निश्चित मानले जात आहे.कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पितृत्त्व रजा घेत मायदेशी परतला होता. ईशांत दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन करेल. त्याचवेळी, जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन यांना दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीतून बाहेर बसावे लागले. इंग्लंडविरुद्ध दोघेही तंदुरुस्त होतील, अशी आशा बाळगली जात आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, उमेश यादव व हनुमा विहारी हे दुखापतीमुळे संघ निवडीसाठी उपलब्ध नसतील. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समिती संघात फारसे बदल करणार नसल्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकलेल्या खेळाडूंना संघात स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. चेन्नईतील पहिल्या दोन्ही कसोटीसाठी भारतीय संघाला २७ जानेवारीला जैव सुरक्षा वातावरणात प्रवेश करावा लागेल. ईशांतने शानदार पुनरागमन करत मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत दमदार मारा केला. बुमराह, सिराजसह तो भारतीय गोलंदाजीचे नेतृत्त्व करेल. शार्दुल ठाकूर, टी. नटराजन राखीव गोलंदाज असतील.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीइशांत शर्मा