Join us  

...तर कोहली आणि शास्त्री यांची योग्यता पारखणं गरजेचं

सुनील गावसकर : संघ व्यवस्थापन संघ निवडीमध्ये सातत्याने चुकत आहे; सलामीचा प्रश्न सोडवावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 7:44 AM

Open in App

मुंबई : ‘भारतीय संघ निवड करताना संघ व्यवस्थापनाकडून वारंवार चुका होत आहेत. जर पुढील दोन कसोटींमध्ये भारताला विजय मिळवण्यात अपयश आले, तर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या योग्यतेचे मूल्यांकन करावे लागेल,’ असे स्पष्ट मत भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी असूनही भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यातील विजयानंतर उंचावलेला आत्मविश्वास पर्थ कसोटीत डळमळीत झालेला पाहायला मिळाला. यानंतर गावसकर यांनी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. ‘पुढील दोन कसोटी सामन्यांत भारताला विजय मिळविता आला नाही, तर कोहली आणि शास्त्री यांच्या योग्यतेचे मूल्यांकन करावे लागेल,’ असे ठाम मत गावसकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ‘संघ निवडताना व्यवस्थापन नेहमी चूक करते. हे दक्षिण आफ्रिका दौºयापासून सुरूच आहे आणि त्याचा फटका संघाला बसत आहे. पर्थ कसोटीतही योग्य संघ निवड केली असती तर सामना जिंकता आला असता.’‘सलामीची समस्या, गोलंदाजांची निवड याचा विचार करावा लागणार आहे. त्यावर तोडगा काढला, तर भारताला पुढील दोन्ही सामने जिंकता येतील. स्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीतही भारत विजयी होत नसेल, तर त्याचा विचार निवड समितीने नक्की करायला हवा,’ असेही गावसकर यांनी सांगितले.गावसकर यांनी मोठ्या चमूवरही टीका केली. ते म्हणाले, ‘१९ खेळाडूंची संकल्पना कोणाची आहे, हे मला शोधायचे आहे. असे असेल, तर आणखी तीन खेळाडू घेऊन का जात नाहीत? बीसीसीआय श्रीमंत संघटना आहे आणि ते ४० लोकांनाही घेऊन जाऊ शकतात. निवड समिती त्यांची जबाबदारी योग्य रीतीने हाताळत नाही.’ लोकेश राहुलला उर्वरित दोन सामन्यांत खेळविण्याचा काहीच प्रश्न उरत नाही. त्याने मायदेशात यावे आणि कर्नाटककडून रणजी क्रिकेट खेळावे. त्याचा फॉर्म गेलाय म्हणून मी हे बोलत नाही, तर त्याचे चित्तच थाºयावर नाही. त्याने हे चुकीचे सिद्ध केल्यास मलाच सर्वाधिक जास्त आनंद होईल.- सुनील गावसकर

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्रीसुनील गावसकर