Irfan Pathan on Gaza: गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल-हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूच्या हजारो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. जगभरातील अनेक देशांनी आणि सेलिब्रिटींनी युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनेही लहान मुलांच्या हत्येविरोधात आवाज उठवला आहे.
इरफान पठाण विश्वचषकात कॉमेंट्री करताना दिसतोय. क्रिकेट सामन्यांवर भाष्य करणारा इरफान अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरही आपले मत व्यक्त करतो. आता त्याने गाझा पट्टीत होणाऱ्या विध्वंस आणि लहान मुलांच्या हत्येवर मत व्यक्त केले आहे. इरफानने शुक्रवार(दि.3) एक ट्विट केले, ज्यात त्याने जागतिक नेत्यांकडे युद्ध थांबवण्याची मागणी केली होती.
'जग शांतपणे पाहत आहे'इरफानने ट्विटमध्ये लिहिले की, "गाझामध्ये 0-10 वर्षे वयोगटातील निष्पाप मुले दररोज आपला जीव गमावत आहेत आणि जग शांत बसले आहे. एक खेळाडू म्हणून मी फक्त आवाज उठवू शकतो, परंतु जगभरातील राजकारण्यांनी एकत्र येऊन या हत्या थांबवण्याची वेळ आली आहे," असे ट्विट इरफानने केले आहे.
9000 हून अधिक लोकांचा मृत्यू झालागेल्या तीन आठवड्यांपासून इस्रायल-हमास युद्ध सुरू आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या अनेक हल्ल्यात गाझा पट्टीतील 9000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय. यात शेकडो महिला आणि मुलांचा समावेश आहे. हमासने हल्ला केल्यापासून इस्रायलने या दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठीच गाझा पट्टीवर शक्य तितक्या मार्गाने जोरदार हल्ले सुरू आहेत. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, हे थांबवण्याची मागणी जगभरातून होत आहे.