नागपूर : विदर्भाला रणजी स्पर्धेत जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना इराणी ट्रॉफी लढतीत संघाला ‘चॅम्पियन’ होण्याच्या स्थितीत पोहोचविले. गुरबानीने ४५ धावांत ४ बळी घेतले. विदर्भाने पहिला डाव ७ बाद ८०० धावसंख्येवर घोषित केल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना शेष भारत
संघाची चौथ्या दिवसअखेर ६ बाद २३६ अशी स्थिती आहे.
एकवेळ शेष भारत संघाची ६ बाद ९८ अशी अवस्था होती. त्यावेळी विदर्भ संघाला निर्णायक विजय मिळेल, असे वाटत होते, पण विहारी व जयंत यादव यांनी सातव्या विकेटसाठी १३८ धावांची अभेद्य भागीदारी करीत शेष भारत संघाचा डाव सावरला. हे दोघे अनुक्रमे ८१ व ६२ धावा काढून खेळपट्टीवर आहेत. शेष भारततर्फे पृथ्वी शॉने ६४ चेंडूंत ५१ धावा केल्या. समर्थ, श्रीकर भारत यांना खातेही उघडता आले नाही. मयंक अग्रवाल (११), करुण नायर (२१) व रविचंद्रन आश्विन (८) यांना मोठी खेळी करता आली नाही.
धावफलक
विदर्भ पहिला डाव : फैज फझल झे. सैनी गो. आश्विन ८९, संजय रामास्वामी झे. समर्थ गो. जयंत यादव ५३, वसीम जाफर त्रि. गो. कौल २८६, गणेश सतीश झे. भरत गो. कौल १२०, अपूर्व वानखेडे नाबाद १५७, अक्षय वाडकर झे. भरत गो. नदीम ३७, आदित्य सरवटे यष्टिचित भरत गो. अग्रवाल १८, अक्षय वखरे झे. व गो. विहारी ००, रजनीश गुरबानी नाबाद २२. अवांतर (१८).एकूण २२६.३ षटकांत ७ बाद ८०० (डाव घोषित). गोलंदाजी : नवदीप सैनी ३६-८-१२३-०, सिद्धार्थ कौल ३६-७-९१-२, रविचंद्रन आश्विन ४३-२-१२३-१, शाहबाज नदीम ४६-५-१६०-१, जयंत यादव ४८-३-२०२-१, रविकुमार समर्थ ५-०-२६-०, हनुमा विहारी ८-०-३२-१, मयंक अग्रवाल ४-०-२१-१.
शेष भारत पहिला डाव :
पृथ्वी शॉ झे. वानखेडे गो. ठाकरे ५१, रविकुमार समर्थ झे. सरवटे गो. गुरबानी ००, मयंक अग्रवाल झे. रामास्वामी गो. उमेश ११, करुण नायर झे. वाडकर गो. गुरबानी २१, हनुमा विहारी खेळत आहे ८१, एस. भरत त्रि. गो. गुरबानी ००, रविचंद्रन आश्विन झे. फझल गो. गुरबानी ०८, जयंत यादव खेळत आहे ६२. अवांतर (२). एकूण ७७ षटकांत ६ बाद २३६. गोलंदाजी : उमेश यादव १४-२-४५-१, रजनीश गुरबानी १३-२-४६-४, आदित्य ठाकरे ११-४-३५-१, आदित्य सरवटे २०-५-५५-०, अक्षय वखरे १८-३-४२-०, संजय रामास्वामी १-०-११-०.