नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदा अकराव्या सत्रासाठी झालेल्या नव्या लिलावानंतर क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाचे सत्र वेगळ्या स्वरूपात समोर येणार असल्याचे त्याच्या उद्घाटन समारंभापासून ते समाप्तीपर्यंतचा प्रवास हटके आणि दमदार असणार याची खात्री सर्वच चाहत्यांना होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) घेतलेल्या एका निर्णयामुळे, सर्व क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला असून, या निर्णयानुसार यंदाच्या आयपीएलचा उद्घाटन समारंभ पूर्वनियोजित वेळेनुसार होणार नाही.
आयपीएलच्या ११व्या सत्राचा उद्घाटन सोहळा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, ६ एप्रिलला मुंबईतील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे होणार होता, परंतु आता हाच उद्घाटन समारंभ छोट्या स्वरूपात ७ एप्रिलला सलामीच्या सामन्याआधी वानखेडे स्टेडियममध्ये होईल. आयपीएल संचालन परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांनी सलामीच्या सामन्याच्या एक दिवस आधी उद्घाटन सोहळा आयोजित करण्याची योजना आखली होती. त्याचबरोबर, यासाठी बॉलीवूडसह हॉलीवूडच्या स्टार्सनाही आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या अत्यंत खर्चिक सोहळ्याला कात्री लावून सीओएने यंदाच्या सत्रामध्ये मोठा बदल केला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने म्हटले की, ‘उद्घाटन समारंभामध्ये ५० कोटी रुपयांचा खर्च सीओएला नको. त्यामुळेच सामन्याआधी हा सोहळा करण्याचा ठरविले आहे, जेणेकरून पैसा आणि वेळेची बचत होईल. (वृत्तसंस्था)
यंदा डीआरएस...
या आधी झालेल्या सर्व सत्रांच्या तुलनेत यंदाचे आयपीएल सत्र सर्वात हटके असेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यंदा पंच समीक्षा प्रणाली (डीआरएस) लागू करण्यात येईल. विशेष म्हणजे, बीसीसीआय गेल्या अनेक वर्षांपासून डीआरएसच्या विरोधात आहे, पण आता आपल्या महत्त्वाच्या लीगमध्ये बीसीसीआयने डीआरएस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.