Join us  

IPL 2021: खेळाडूंनंतर आता पंचही घेतायत IPL मधून माघार; नितीन मेनन, पॉल रेफेल घरी परतले!

IPL 2021: आयपीएलवरील कोरोना संकट आता आणखी गडद होत चाललं आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडत असताना आता पंच देखील माघार घेताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:03 AM

Open in App

IPL 2021: आयपीएलवरील कोरोना संकट आता आणखी गडद होत चाललं आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडत असताना आता पंच देखील माघार घेताना दिसत आहेत. आयसीसीच्या एलिट पॅलनमधील सदस्य असलेले भारताचे नितीन मेनन आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रेफेल यांनी वैयक्तीक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. (IPL 2021 Umpires Nitin Menon and Paul Reiffel pull out of the tournament)

नितीन मेनन यांच्या मातोश्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मेनन यांनी स्पर्धेतून माघार घेतली असून ते इंदौर येथील त्यांच्या राहत्या घरी परतले आहेत. तर पॉल रेफेल यांनी ऑस्ट्रेलियन सरकारनं भारतीय विमानांवर घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. 

आयपीएलमधून आतापर्यंत पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे. यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य फिरकीपटू आर.अश्विन याचा देखील समावेश आहे. अश्विनच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यानं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या लियाम लिव्हिंगस्टोनं यानं बायो बबलचा त्रास होत असल्यानं माघार पत्करली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे अॅडम झम्पा, अँड्र्यू टाय आणि केन रिचर्डसन यांनी भारतातील कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

मेनन, रेफेल आयपीएलच्या मॅच ऑफिशिअल्समधून माघार घेणारे पहिले सदस्य"नितीन मेनन यांना लहान मूल आहे आणि त्यांच्या मातोश्रीसह पत्नी देखील कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे लहान मुलासोबत राहणं हे प्राधान्य असल्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर रेफेल यांना ऑस्ट्रेलियन सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे मायदेशी परतता येणार नाही अशी भीती आहे. बीसीसीआयनं याआधीच बॅकअप प्लान म्हणून भारतीय पंचांची नियुक्ती केलेली आहे", अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे. 

दरम्यान, बीसीसीआयचे अंतरिम सीईओ हेमंग अमीन यांनी आयपीएलमधील सर्व संघांना एक पत्र लिहीलं आहे. यात स्पर्धेशी निगडीत सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक, पंच, समालोचक, व्यवस्थापक या सर्वांना स्पर्धा संपल्यानंतर सुखरुप घरी पोहोचवणं ही बीसीसीआयची जबाबदारी आहे, असं आश्वासन सर्व संघांना देण्यात आलं आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१कोरोना वायरस बातम्या