Join us  

IPL 2020: आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाचे पर्व; प्रेक्षकांची मात्र उणीव जाणवतेय

Ab de villiers News: एकाच मैदानावर एकाचवेळी चार संघ सराव करीत असतात, पण एका संघाला दुसऱ्या संघासोबत भेटण्याचे स्वातंत्र्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 1:45 AM

Open in App

एबी डिव्हिलियर्स कॉलम...

कठीण समयी चार्ल्स डिकेंसची प्रसिद्ध कादंबरी ‘टेल ऑफ टू सिटीज’च्या सुरुवातीच्या काही ओळी अशा आहेत.‘ही सर्वांत चांगली वेळ होती, सर्वात खराब वेळ होती. ही ज्ञान ग्रहण करण्याची वेळ होती, ही मूर्खपणाची वेळ होती. ही प्रकाशाची वेळ होती, ही अंधकाराची वेळ होती.’ कदाचित ते आयपीएल २०२० बाबत लिहित असावे. ही स्पर्धा संकटसमयी खेळली जात आहे. विश्व महामारीमुळे जग निराशेच्या गर्तेत सापडले असताना या स्पर्धेमुळे चाहत्यांना आशेचा किरण दिसला असेल. त्यामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर काही अंशी आनंद परतला आहे. त्यामुळे हे पर्व महत्त्वाचे ठरले आहे.

माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढू नका. मी असे नक्कीच म्हणत नाही की क्रिकेटच सर्वकाही सुरळीत करू शकते. पण, सर्वत्र वाईट घडत असताना क्रिकेट काही चांगले वृत्त देऊ शकते. त्यामुळे याची भूमिका महत्त्वाची ठरते. येथे संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळाडू, प्रशिक्षक आणि स्टाफ बायो बबलमध्ये राहत आहेत. ते आपल्या संघाव्यतिरिक्त अन्य कुणासोबत बातचितही करीत नाहीत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उणीव नक्कीच भासत आहे. आम्हाला चिन्नास्वामी स्टेडियमचीही आठवण होते. तरी येथे सुरक्षित व एकत्रित असल्याचे समाधान आहे, त्यामुळे आयोजकांचे आभार मानतो.

येथे एकाच मैदानावर एकाचवेळी चार संघ सराव करीत असतात, पण एका संघाला दुसऱ्या संघासोबत भेटण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे आम्हाला आमचा वेळ आमच्याच संघासोबत घालवावा लागतो. आमचे एकमेकांसोबत चांगले संबंध स्थापन झाले आहेत.भारतासह जगभरात लाखो चाहते टीव्हीवर सामन्याचा आनंद घेत आहेत. अनेकांना शारीरिक व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याची कल्पना आहे. अशा कठिण समयी क्रिकेटमुळे त्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे. ही सर्वांच्या आयुष्यात अनोखी वेळ आहे. अशा वेळी आयपीएलचा आनंद घेण्यास सुरुवात झाली. (टीसीएम)

 

टॅग्स :IPL 2020