हर्षा भोगले लिहितात...
केकेआरच्या वाटचालीत मी नेहमी चढउतार पाहिले आहेत. कामगिरी आणि भावना या दोन्ही आघाड्यांवर हा फरक जाणवला. हा संघ चाहत्यांना यंदा पुन्हा एकदा चढउताराचा अनुभव देत आहे. संघाने सुरुवातीच्या पाचपैकी चार सामने जिंकले, पण पुढे सलग पाच सामने गमविले. प्ले आॅफसाठी आता उर्वरित चारही सामने जिंकण्याची गरज असेल. संघ संकटात आहे, कारण प्रत्येक पराभवानंतर स्पर्धा आणखी कडवी होत जाते. प्ले आॅफ गाठण्याचे ओझे न बाळगता हा संघ मुक्तपणे खेळेल का, हे पाहणे रंजक ठरेल.
टी२० क्रिकेटचे सूत्र निडर होऊन खेळणे हेच आहे. यासंदर्भात आरसीबीचे उदाहरण देता येईल. या संघाची पात्रता फेरीची शक्यता संपुष्टात येताच संघ धोकादायक बनत गेला. आयपीएल सामन्यात जी साधने उपलब्ध आहेत त्याचा अधिकाधिक उपयोग मोलाचा ठरतो. दिनेश कार्तिक वरच्या स्थानावर फलंदाजीला येईल का, हे पहायचे आहे. अनेकदा कर्णधार स्वत:ची भूमिका निश्चित करण्यात अपयशी ठरतो. अशावेळी कार्तिकने चौथ्या ंिकंवा पाचव्या स्थानी आणि रसेलला पाचव्या किंवा सहाव्या स्थानी खेळवायला हवे. आतापर्यंत दोघांना खेळण्यास हवे तसे चेंडू वाट्याला आले नाहीत.
केकेआरला आता राजस्थानच्या आव्हानास सामोरे जायचे आहे. राजस्थान यंदा जोस बटलरवर अधिक विसंबून राहिला. बेन स्टोक्ससाठीही हे सत्र खराब ठरले. बटलरच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ व रहाणे यांना जबाबदारी सांभाळावी लागेल. संघाला स्टोक्सची जास्त उणीव जाणावणार नाही. कारण तो गोलंदाजी करीत नव्हता. पण आर्चरची अनुपस्थितीत संघावर मोठा आघात ठरेल. आर्चरची चार षटके संघासाठी फारच महत्त्वाची होती. केकेआरला हा सामना जिंकायचा झाल्यास उथप्पा व कुलदीप यांचे फॉर्ममध्ये असणे मोलाचे ठरेल. (टीसीएम)