Join us  

‘कोहलीच्या नेतृत्वात भारत सर्व स्पर्धा जिंकेल’

आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वच संघाचे लक्ष्य भारतीय संघ असतो, असे वेस्ट इंडिजचा दिग्गज माजी फलंदाज ब्रायन लारा याने सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 1:58 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्यास सक्षम आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वच संघाचे लक्ष्य भारतीय संघ असतो,’ असे वेस्ट इंडिजचा दिग्गज माजी फलंदाज ब्रायन लारा याने सांगितले.लारा म्हणाला,‘माझ्या मते भारतीय संघ प्रत्येक संघाचे लक्ष्य बनला आहे. या गोष्ठीसाठी विराट कोहली व त्याच्या साथीदारांचे कौतुक केले पाहिजे. प्रत्येक संघाला कल्पना असते की त्यांना स्पर्धेच्या एका टप्प्यात भारताविरुद्ध खेळायला लागेल. हा सामना उपांत्यपूर्व, उपांत्य किंवा अंतिम असू शकतो.’कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी व एकदिवसीय प्रकारात मोठी झेप घेतली आहे. मात्र त्यांना आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. भारताने २०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये आयसीसीची स्पर्धा जिंकली होती.लाराचा कसोटीमधील नाबाद ४०० धावांचा विश्वविक्रम अद्याप कायम आहे. लाराच्या मते हा विक्रम मोडण्याची क्षमता कोहली, रोहित शर्मा व डेव्हिड वॉर्नर यांच्यात आहे. तो म्हणाला, ‘स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानी फलंदाजी करत असल्याने त्याला या विक्रमापर्यंत पोहचणे कठीण आहे. तो चांगला फलंदाज आहे. डेव्हिड वॉर्नर मात्र असे करू शकतो. कोहली लगेच लय पकडतो. रोहित शर्माला लय सापडली तर तो अशी कामगिरी नक्कीच करेल.’’

टॅग्स :विराट कोहली