मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका सध्या रंगतदार अवस्थेत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे आता ही मालिका कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिकाही सुरु होणार आहे. या एकदिवसीय मालिकेत भारताला मोठा धक्का बसू शकतो असे म्हटले जात आहे.
ट्वेन्टी-२० मालिकेपूर्वीही भारताला काही धक्के बसले होते. या मालिकेपूर्वी सलामीवीर शिखर धवन दुखापग्रस्त झाला होता. त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती. पण आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये संजूला एकही संधी देण्यात आलेली नाही.
धवनला भारतातील सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती. एक फटका मारताना चेंडू धवनच्या डाव्या गुडघ्यावर लागला होता. त्यामुळे धवनला मोठी दुखापत झाली होती आणि त्याने ट्वेन्टी-२० मालिकेतून माघार घेतली होती.
आता काही दिवसांमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. त्यासाठी भारताचा संघही काही दिवसांमध्ये आपल्या समोर येणार आहे. धननला झालेली दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे तो एककदिवसीय मालिकेत खेळणार की नाही, याबद्दस संदिग्घता निर्माण झालेली आहे. पण फिट झाल्यावरही त्याला चाचणी द्यावी लागणार असून ही गोष्ट किती लवकर करता येईल, याबद्दलही संभ्रम आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला धवन एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.
पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेलं 208 धावांचा लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स व 8 चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद 94 धावा चोपून भारताला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 207 धावा केल्या. एव्हिन लुईसनं 17 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 40 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेंडन किंग ( 31), शिमरोन हेटमायर ( 56) आणि किरॉन पोलार्ड ( 37) यांनी फटकेबाजी केली. जेसन होल्डरनही 9 चेंडूंत 24 धावा चोपल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात दोन धक्के देत विंडीजच्या धावगतीला चाप बसवला. पण दुसऱ्या सामन्यात मात्र भारताला पराभव पत्करावा लागला होता.