Join us  

India vs West Indies : भारताचा वेस्ट इंडिजवर विजय; मालिकाही २-१ अशी जिंकली

फटकेबाजी करण्याचा नादात पोलार्डने आपला बळी गमावला आणि वेस्ट इंडिजच्या हातून सामना निसटला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 10:37 PM

Open in App

मुंबई : तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आणि मालिका २-१ अशी खिशात टाकली. भारताने वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी २४१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा वेस्ट इंडिजला यशस्वी पाठलाग करता आला नाही आणि त्यांना सामन्यासह मालिका गमवावी लागली. भारताने हा सामना ६७ धावांनी जिंकला.

 

फलंदाजीला येण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला सलामीवीर इव्हिन लुईसच्या रुपात मोठा धक्का बसला होता. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे लुईसला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. त्यामुळे या सामन्यात त्यांना चांगली सलामी मिळू शकली नाही. शिमरोन हेटमायरने भारताच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ४१ धावांवर समाधान मानावे लागले.

वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डने अर्धशतक झळकावत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण फटकेबाजी करण्याचा नादात पोलार्डने आपला बळी गमावला आणि वेस्ट इंडिजच्या हातून सामना निसटला. पोलार्डने ३९ चेंडूंत ६८ धावा केल्या.

मुंबई : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोन्ही सलामीवीरांनी वानखेडेवरच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांच्या दणदणीत खेळींच्या जोरावर भारताला वेस्ट इंडिजपुढे 241 धावांचे आव्हान ठेवता आले. लोकेश राहुलने यावेळी ५६ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ९१ धावांची खेळी साकारली. रोहितने त्याला ७१ धावांची झंझावाती खेळा साकारून चांगली साथ दिली, तर कोहलीनेही यावेळी धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारताला दणकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पाचव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.

रोहितने यावेळी षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही रोहित आक्रमक फटकेबाजी करत होता. दुसरीकडे राहुलही गोलंदाजीवर तुटून पडत होता. रोहितनंतर राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर एक मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला. रोहितने ३४ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

रोहित बाद झाल्यावर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला. पण पंतला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पंतनंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीनेही आक्रमक पवित्रा सुरुवातीपासून ठेवला. या दोघांनीही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीवर प्रहार करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मालोकेश राहुल