Join us  

India vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 'या' दोन खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; होऊ शकते विश्वचषकासाठी निवड

आगामी विश्वचषकात या दोन्ही खेळाडूंची निवड करण्यात येऊ शकते, पण त्यासाठी त्यांनी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 6:42 PM

Open in App

हैदराबाद : भारतासाठी वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका फार महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे. कारण आता भारतीय संघाने ट्वेन्टी-२- विश्वचषका दिशेने आपली पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या मालिकेत भारताच्या दोन खेळाडूंवर सर्वांची नजर असणार आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याला काही तासांचा अवधी राहीलेला आहे. पण या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात कोणते खेळाडू संघात असतील, याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना उद्या हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर ८ आणि ११ डिसेंबरला ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा संघ मातब्बर समजला जातो. कारण आतापर्यंत त्यांनी दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक पटकावलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या संघाचे कर्णधारपद कायरन पोलार्डला देण्यात आले आहे.

भारतीय संघातील काही खेळाडूंचे स्थान पक्के असल्याचे म्हटले जात आहे. पण काही खेळाडूंना अजूनही आपले स्थान निश्चित करता आलेले नाही. भारतीय संघात असे दोन खेळाडू आहे, ज्यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. आगामी विश्वचषकात या दोन्ही खेळाडूंची निवड करण्यात येऊ शकते, पण त्यासाठी त्यांनी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. हे दोन खेळाडू नेमके कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे दोन खेळाडू म्हणजे रिषभ पंत आणि लोकेश राहुल.

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात कोणाला मिळणार संधी; कोण करणार रोहितबरोबर ओपनिंग...भारताची सलामीची जबाबदारी रोहित शर्मावर असेल. पण रोहितबरोबर यावेळी कोणता खेळाडू सलामीला येणार, याची सर्वात जास्त चर्चा आहे. कारण शिखर धवन हा दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात संघात पुनरागमन केलेल्या संजूला संधी मिळते का, याची उत्सुकता सर्वांना असेल.

रोहितबरोबर सलामीला यावेळी संजूपेक्षा लोकेश राहुलला पसंती देण्यात येईल, असे म्हटले जात आहे. कारण राहुलकडे अनुभव आहे आणि त्याने गेल्या काही दिवसांमध्ये स्थानिक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या स्थानावर कर्णधार विराट कोहली आणि चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. कोहलीचा भरपूर विश्वास रिषभ पंतवर आहे, त्यामुळे त्याला या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाऊ शकते.

पंतनंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतील. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल यांना स्थान मिळू शकते.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरिषभ पंतलोकेश राहुल