Join us  

India vs West Indies, 1st Test : बाऊन्सरला घाबरत नाही म्हणणारा कोहली उसळत्या चेंडूवरच आऊट झाला 

कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 9 धावा केल्या, यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 10:24 PM

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः फलंदाजीला गेल्यावर लगेचच मला बाऊन्सर टाका, असं विधान करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली तोंडघशी पडला आहे. कारण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कोहली उसळत्या चेंडूवरच आऊट झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर यावेळी काही बाऊन्सर्सचा समर्थपणे सामना कोहलीला करता न आल्याचेच पाहायला मिळाले.

कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 9 धावा केल्या, यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. कोहली आता आक्रमकपणे फलंदाजी करणार, असे वाटत असताना कोहली वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रियलच्या गोलंदाजीवर आऊट झाला. गॅब्रियलने एक उसळता चेंडू कोहलीच्या ऑफ स्टम्पच्या दिशेने टाकला. कोहली हा चेंडू मारण्यासाठी गेला आणि त्याचा झेल गलीमध्ये उभ्या असलेल्या ब्रुक्सने पकडला. बाद होण्यापूर्वी कोहलीला काही बाऊन्सर्स टाकण्यात आले. यावेळी कोहलीला या बाऊन्सर्सचा सामना कोहलीला समर्थपणे करता आला नसल्याचेच पाहायला मिळाले.

फलंदाजीला गेल्यावर मला बाऊन्सरचा झटका बसावा, कोहलीचं अजब विधानअॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला बाऊन्सर लागला आणि तो मैदानातच कोसळला. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्यानंतर स्मिथला मैदानात येता आले नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यालाही स्मिथला मुकावे लागले. पण आता भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक अजब विधान केले आहे. ' फलंदाजीला गेल्यावर लगेचच मला बाऊन्सरचा झटका बसावा, ' असे विधान कोहलीने केले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहीलीची एक खास मुलाखत झाली. ही मुलाखत वेस्ट इंडिजचे माजी महान फलंदाज सर विवियन रीचर्ड्स यांनी घेतली. यावेळी रीचर्ड्स यांनी आपण कधीच हल्मेट का घातले नाही, याबाबत खुलासा केला. त्यानंतर कोहलीने अजब विधान केल्याचे पाहायला मिळाले.

कोहली म्हणाला की, " जेव्हा मी मैदानात पोहोचेन तेव्हा लगेचच मला बाऊन्सर टाकला जावा. कारण डावाच्या सुरुवातीला बाऊन्सर आला तर त्यानंतर तुम्ही अधिक इर्षेने मैदानात उतरता. त्यामुळे डावाच्या सुरुवातीलाच बाऊन्सर लागायला हवा."

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज