साऊदम्टन, भारत वि. इंग्लंड कसोटीः चौथ्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य इंग्लंडने ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे तीन फलंदाज अवघ्या 22 धावांवर माघारी परतले आहेत. लक्ष्याचा आकडा पाहता भारताला ही कसोटी जिंकणे सोपं वाटत असलं तरी इंग्लंडमधील इतिहास भारताच्या विरोधात आहे. भारताने तीन वेळाच चौथ्या डावात धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे आणि 173 धावा हे त्यातील सर्वोत्तम लक्ष्य होते.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची ही कसोटी मालिका निर्णायक टप्प्यावर आहेत. तिसरी कसोटी जिंकून भारताने मालिकेतील आव्हान 1-2 असे जिवंत ठेवले आहे. त्यामुळे इंग्लंडला मालिका विजयासाठी आणि भारताला बरोबरीसाठी चौथा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. पण, भारताला ते सहज शक्य नाही. भारताने 1971 साली इंग्लंडमध्ये चौथ्या डावात 173 धावांचे लक्ष्य पार केले होते आणि ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानंतर 1986 आणि 2007 मध्ये भारताने चौथ्या डावात अनुक्रमे 135 व 72 धावांचा पाठलाग केलेला आहे. इंग्लंडमध्ये 22 सामन्यांत भारताला केवळ तीन वेळाच चौथ्या डावात यशस्वी पाठलाग करता आला आहे.
![]()
भारताने 245 धावांचा यशस्वी पाठलाग केला, तर भारताची इंग्लंडमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरेल. आशिया खंडाबाहेरील कामगिरीचा आढावा घेतल्यास हा चौथा मोठा विजय ठरेल. भारताने 1976 मध्ये चार विकेटच्या मोबदल्यात वेस्ट इंडीजविरुद्ध 406 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर 2001 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 3 बाद 264 आणि 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 5 बाद 258 धावांचा पाठलाग केला होता.