Join us  

India vs Australia : 'त्या' प्रसंगानंतर निराश झालेल्या अजिंक्य रहाणेला आलेला एक SMS ठरला टर्निंग पॉईंट!

विराट कोहली, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रोहित शर्मा यांच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) कौशल्यानं नेतृत्व केलं. त्यात उमेश यादवही जायबंदी झाल्यानं कोणताही कर्णधार डगमगला असता, परंतु अजिंक्यच्या संयमी व शांत स्वभावानं त्याला कणखर ठेवले.

By स्वदेश घाणेकर | Published: December 30, 2020 8:49 AM

Open in App

India vs Australia, 2nd Test : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियावर ८ विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. ऑस्ट्रेलियाचे ७० धावांचे लक्ष्य टीम इंडियानं २ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.  पदार्पणवीर मोहम्मद सिराजला प्रोत्साहन देत राहत अजिंक्यनं त्याच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. सिराजनं दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेत ऑसींना धक्के दिले. 

या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्यला मॅन ऑफ मॅचसाठी दिल्या जाणाऱ्या 'Mullagh Medal' नं सन्मान केला गेला. हे पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. बॉक्सिंग डे कसोटीत सचिन तेंडुलकरनंतर ( Sachin Tendulkar) शतक करणारा अजिंक्य हा पहिला भारतीय ठरला. मध्यमवर्गीय कुटूंबात जन्मलेल्या अजिंक्यनं अथक मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण, त्याच्या या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं एका SMS नं वळण दिलं. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहित असावी. 

२९ डिसेंबर २०१३ ची ही घटना आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील हा प्रसंग आहे. डरबन कसोटीत अजिंक्यचे चार धावांनी शतक हुकले आणि तो त्या दिवशी अस्वस्थ झाला होता. त्यावेळी त्याला मुंबईतून एक SMS आला. 'कसोटी क्रिकेट काय आहे आणि शतकाचं मोल काय असतं, याची जाणीव तुला झाली असेल,'असा तो SMS होता. त्यानंतर अजिंक्यच्या कारकिर्दीला नवं वळण मिळालं. ''मी तुम्हाला शतकासाठी  फार वाट पाहायला लावणार नाही'', असे उत्तर अजिंक्यनं SMS ला पाठवलं. त्यानंतर त्यानं १४ फेब्रुवारी २०१४ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर ११८ धावांची खेळी केली. पुढे लॉर्ड्सवर शतक झळकावून इतिहास रचला. अजिंक्यला मुंबईमधून तो SMS महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं पाठवला होता. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेसचिन तेंडुलकरभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया