India vs Australia, 3rd Test Day 5 : कोण म्हणतं कसोटी क्रिकेट कंटाळवाणं आहे?, व्ही व्ही एस लक्ष्मणच्या या प्रश्नानं सर्वांचे लक्ष वेधले आहे. ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग यानं टीम इंडिया दुसऱ्या डावात दोनशे धावाही करणार नाही, असा दावा केला असताना भारतीय फलंदाजांनी त्याच्या मुस्काटात मारणारी कामगिरी करून दाखवली. ४०७ धावांच्या लक्ष्यासमोर टीम इंडियाचे फलंदाज ढेपाळतील असा तर्क लावणारेही गपगुमान कोपऱ्यात जाऊन बसले असतील. दुखापतग्रस्त खेळाडूंसह टीम इंडियानं हा सामनाच वाचवला नाही, तर ऑस्ट्रेलियाला तोडीत तोड उत्तर दिले. डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीसह रिषभ पंत ( Rishabh Pant) मैदानावर उतरला आणि धावांचा पाऊस पाडला. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याच्या संयमाची त्याला साथ मिळाली. मांडीचे स्नायू ताणल्यानंतर धाव घेण्यासाठी संघर्ष करणारा हनुमा विहारी सहाव्या विकेटसाठी आर अश्विनसह खेळपट्टीवर नांगर रोवून राहिला. या दोघांनी 250+ चेंडू खेळून काढताना सामना अनिर्णित राखला.
पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) बाद झाल्यानं टीम इंडियावरील संकट वाढलं.. आता काही खरं नाही, असं वाटत असताना रिषभ मैदानावर आला आणि तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूनं चेतेश्वर सपोर्टीव्ह नायकाची भूमिका पार पाडत होताच. पराभवाच्या छायेत असलेल्या टीम इंडियाला त्यानं विजयाचे किरण दाखवले. दुर्दैवानं ९७ धावांवर तो बाद झाला. हनुमा विहारीचा फॉर्म पाहता, आता टीम इंडियाचं काही खरं नाही, असंच वाटत होते. त्यामुळे फ्रॅक्चर अंगठा असूनही रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) गरज पडल्यास फलंदाजीला येण्यासाठी सज्ज होताच. सेट फलंदाज चेतेश्वर ७७ धावांवर माघारी परतला. विहारीच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आणि दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढली. पण, विहारी खेळपट्टीवर अडून बसला.